मुंबई: सध्या सत्ताधारी महायुतीतील घटक पक्षांकडून विरोधी पक्षातील आमदार-खासदार फोडण्याच्या चर्चा रंगत असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित यांनी सत्तेतील मोठ्या पक्षाकडून त्यांच्या स्वतःच्याच मित्रपक्षांची शिकार होणार असल्याचा दावा केला आहे.
यासंदर्भात केलेल्या एक्स पोस्टमध्ये रोहित पवार यांनी म्हटले आहे की, भाजपच्या मित्रपक्षांकडून विरोधी पक्षाचे आमदार,खासदार फोडणार असल्याच्या बातम्या समोर आल्या, परंतु वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे, पुढच्या महिन्याच्या शेवटपर्यंत सत्तेतील मोठ्या पक्षाकडून त्यांच्याच मित्रांची शिकार केली जाणार असल्याची पक्की माहिती आहे.
तसेच महाराष्ट्राला काळिमा फासणारे भोंदू खरात प्रकरण हे समोर आलेले नाही, तर ते ठरवून बाहेर आणले गेले आहे. ही फक्त सुरुवात असून पुढील काळात अशा आणखी घटना उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही,असा दावाही त्यांनी केला.
सत्ताधारी मित्रपक्षांमधील संबंधांवर भाष्य करताना पवार म्हणाले, आज भाजप मित्रपक्षांप्रती ‘ए दोस्ती हम नहीं छोड़ेंगे’ अशी भावना दाखवत आहे. मात्र उद्या हीच भावना ‘जा बेवफा जा हमें’याहून वेगळी असणार नाही हे नक्की आहे. त्यामुळे आपलीच भाजपकडून शिकार होऊ नये यासाठी मित्रपक्षांनी अधिक काळजी घेणे उचित राहील, असा सल्ला त्यांनी सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादीला दिला आहे.