मुंबई : भारतीय टपाल खात्याने 1 सप्टेंबर 2025 पासून रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय टपाल विभागाच्या आधुनिकीकरण योजनेचा एक भाग असून याचा उद्देश काम अधिक जलद चालवणे असा असल्याचे टपाल विभागाने स्पष्ट केले आहे. रजिस्टर्ड पोस्ट सेवा आता स्पीड पोस्टमध्ये विलीन केली जाईल. टपाल विभागाच्या या निर्णयामुळे सर्वात जुनी रजिस्टर्ड पोस्टसेवा इतिहासजमा होणार आहे.
टपाल विभागाच्या सचिव आणि महासंचालकांनी सर्व सरकारी कार्यालये, न्यायालये, शाळा-महाविद्यालये आणि मोठ्या प्रमाणात टपाल सेवा वापरणार्यांना 1 सप्टेंबरपर्यंत पूर्णपणे स्पीड पोस्टवर वळण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांच्या मते स्पीड पोस्टमुळे डिलिव्हरी जलद होईल, ट्रॅकिंग चांगले होईल आणि कामकाजात अधिक पारदर्शकता येईल. रजिस्टर्ड पोस्ट सेवा 1854 मध्ये सुरू झाली. त्यानंतर स्पीड पोस्ट 1986 मध्ये सुरू झाले. मात्र रजिस्टर्ड पोस्टपेक्षा ते लोकांमध्ये आधीच लोकप्रिय आहे.
रजिस्टर्ड पोस्ट बंद केल्याने अनेक लोक भावनिक झाले आहेत, विशेषतः वृद्ध आणि गावांमध्ये राहणारे लोक. ही सेवा ब्रिटिश काळापासून सुरू होती आणि बँका, विद्यापीठे, न्यायालये आणि सरकारी कार्यालयांसाठी विश्वासार्ह होती. त्याची खासियत अशी की डिलिव्हरीचा पुरावा न्यायालयातही वैध होता. आता ते बंद केल्याने केवळ तांत्रिक बदल होणार नाहीत तर एका ऐतिहासिक टपाल सेवेचाही अंत होईल.
वापर झाला कमी गेल्या काही वर्षांत रजिस्टर्ड पोस्टचा वापर सातत्याने कमी होत आहे. सरकारी आकडेवारीनुसार, 2011-12 मध्ये 244.4 दशलक्ष नोंदणीकृत टपाल पाठवण्यात आले होते, तर 2019-20 मध्ये ही संख्या 184.6 दशलक्ष झाली. डिजिटल कम्युनिकेशन, खासगी कुरिअर आणि ई-कॉमर्स लॉजिस्टिक्समध्ये वाढ झाल्यामुळे या सेवेची मागणी कमी झाली आहे.