मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह राज्यातील 132 रेल्वेस्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. तसेच विदर्भातील गोंदिया ते बल्लारशाह या रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासाठी तब्बल 4 हजार 819 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे विदर्भातील रेल्वे संपर्क अधिक मजबूत होणार असून, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व आंध्र प्रदेशाशी व्यापार-व्यवसाय वाढण्यास मदत होणार आहे.
वांद्रे-कुर्ला येथे शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी राज्यातील विविध रेल्वे प्रकल्पांची सविस्तर माहिती देण्यात आली. गोंदिया ते बल्लारशाह या रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासाठी तब्बल 4 हजार 819 कोटींची तरतूद केल्याबद्दल फडणवीस यांनी वैष्णव यांचे आभार मानले.
रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून लवकरच छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेन सुरू होणार आहे. यामध्ये महाराजांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाचे किल्ले, सांस्कृतिक स्थळे यांचा समावेश असलेला दहा दिवसांची टूर आयोजित केली जाणार आहे. या उपक्रमामुळे महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्यास मदत होणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.