मुंबई: केवळ दोन राष्ट्रवादी काँग्रेसच नाहीतर येत्या पंधरा वीस दिवसांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे देखील एकत्र आलेले दिसतील, असा दावा आमदार रवी राणा यांनी केला आहे.
राजकारणात काहीही अशक्य नाही, असे सांगून रवी राणा म्हणाले, उद्धव ठाकरे हे पुन्हा राम आणि हनुमान यांच्या विचाराकडे परत येत आहेत.
काही दिवसात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे देखील एकत्र आलेले दिसतील. राजकारणात जे अशक्य वाटते, ते नेहमीच शक्य झालेले आपण पाहिले आहे. त्यामुळे हे घडू शकते, असे राणा यांनी ठामपणे सांगितले.
तसेच येणाऱ्या १५ दिवसांमध्ये सुनेत्रा पवार आणि शरदचंद्र पवार साहेब यांचे दोन्ही पक्ष (गट) एकत्र येतील, हे चित्र तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आल्यास सत्तेचे आणि नेतृत्वाचे वाटप कसे असेल, याचेही भाकीतही राणा यांनी वर्तवले आहे.
राणा म्हणाले, दिल्लीतील राजकारण सुप्रियाताई सुळे पाहतील आणि राज्याचे नेतृत्व सुनेत्राताई पवार करतील. केंद्रात सुप्रियाताई मंत्री बनतील आणि संपूर्ण राज्य सांभाळण्याची जबाबदारी ही सुनेत्रा पवार यांच्याकडे राहील.