पुढारी ऑनलाईन डेस्क : ख्यातनाम उद्योजक, भारतीयांच्या गळ्यातील ताईत बनलेले उद्योगपती आणि टाटा उद्योग समूहाचे अध्वर्यू रतन नवल टाटा यांचे बुधवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या जाण्याने उद्योगजगतातील लखलखता ध्रुवतारा निखळला आहे. या वार्तेनंतर संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. 1937 मध्ये मुंबईत जन्म झालेले रतन टाटा हे नाव भारताच्या घराघरांत विश्वासाचे प्रतीक म्हणून घेतले जाते. त्यांच्या निधनाने उद्योगजगताचा लखलखता ध्रुवतारा निखळून पडला.
शिवसेना (UBT) नेते उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे, अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांनी मुंबईत रतन टाटा यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत त्यांना श्रद्धांजली वाहिली.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांना पत्र लिहून उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
रतन टाटा यांचे कार्यकर्तृत्व लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्ताव आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत संमत करण्यात आला.
आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला एनसीपीए मैदानावर रतन टाटा यांचे अंत्यदर्शन घेतले.
ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे पार्थिव NCPA मध्ये आणण्यात आले आहे. येथे अंतिम श्रद्धांजली देण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी टाटा समूहाचे अध्यक्ष एमेरिटस, रतन टाटा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. शोकसंदेशात, राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले की, "आधुनिक व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करून, रतन टाटा यांनी एक विश्वासू भारतीय म्हणून टाटा समूहाची स्थापना केली. जागतिक ब्रँड, संस्थापकांच्या व्हिजनशी कधीही तडजोड न करता मूल्यांचा ऱ्हास होत असताना, रतन टाटा यांनी त्यांच्या वैयक्तिक, सामाजिक आणि व्यावसायिक जीवनात सर्वोत्तम नैतिक मूल्यांचे समर्थन केले आणि त्यांचे संरक्षण केले."
मुंबईतील एनसीपीए नरिमन पॉईंट येथे तयारी सुरू आहे. रतन टाटा यांचे पार्थिव अंत्यसंस्कारांपूर्वी लोकांना अंत्यदर्शनासाठी येथे आणले जाणार आहे.
रतन टाटा यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र सरकारने एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे. सर्व सरकारी इमारतींवर राष्ट्रध्वज अर्ध्यावर असेल आणि आज सरकारचा कोणताही सांस्कृतिक किंवा मनोरंजन कार्यक्रम होणार नाही. रतन टाटा यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
मुंबई पोलिसांचे दक्षिण विभागाचे अतिरिक्त आयुक्त अभिनव देशमुख म्हणाले, 'रतन टाटा यांचे पार्थिव सकाळी 10 ते दुपारी 3:30 या वेळेत दर्शनासाठी NCPA येथे ठेवण्यात येणार आहे. दर्शनासाठी येणाऱ्यांना तेथे पार्किंगची सुविधा नाही. पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, पोलिसांचा पूर्ण बंदोबस्त तैनात आहे.
रतन टाटा यांच्या पार्थिवावर मुंबईतील वरळी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दुपारी ४ वाजता पार्थिव डॉ. ई. मोझेस रोड, वरळी येथील स्मशानभूमीत नेण्यात येईल.
रतन टाटा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोएल टाटा यांच्याशी बोलून रतन टाटा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भारत सरकारच्या वतीने रतन टाटा यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार आहेत.