रतन टाटा यांच्या पार्थिवावर वरळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ANI X Account
मुंबई

रतन टाटा अनंतात विलीन

अविनाश सुतार

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : टाटा सन्सचे अध्यक्ष रतन नवल टाटा यांच्या पार्थिवावर आज (दि.१०) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मुंबईतील वरळी येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याआधी मुंबई पोलिसांनी त्यांच्या पार्थिवाला मानवंदना दिली.

टाटा हे पारशी समाजाचे होते. परंतु, त्यांच्यावर हिंदू रितीरिवाजानुसार विद्युत वहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी टाटांचे पार्थिव नरिमन पॉइंट येथील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (NCPA) येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. तेथे सर्व स्तरातील मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेत श्रद्धांजली वाहिली. तसेच त्यांचा पाळीव 'गोवा' श्वानाने त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल, केंद्रीय मंत्री पियुष गोयल आदीसह राजकीय, सामाजिक, सिने क्षेत्र, उद्योग क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच टाटांना अखेरचा निरोप देण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

टाटा सन्सचे अध्यक्ष रतन नवल टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. बुधवारी (दि.९) रात्री साडेअकराच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात (आयसीयू) ७ ऑक्टोबररोजी दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली होती. मात्र, त्यांनी स्वत: या गोष्टीचा इन्कार करत आपण बरे असल्याचे सांगत रुटीन चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याचे सांगितले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT