मनसे अध्यक्ष राज ठाकरे.  (file photo)
मुंबई

Raj Thackeray : युतीच्या चर्चा तुमच्याशी करायच्या का आता?, राज यांची आगपाखड

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठाकरे बंधू एकत्र लढतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु असताना राज ठाकरे यांनी मोठा खुलासा केलाय

दीपक दि. भांदिगरे

Raj Thackeray on MNS and Uddhav Thackeray alliance

हिंदी सक्तीचा निर्णय रद्द झाल्यानंतर आयोजित केलेल्या विजयी मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले. आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठाकरे बंधू एकत्र लढतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठा खुलासा केला आहे. ''५ जुलैचा विजयी मेळावा हा राजकीय नव्हता तर तो मराठी मराठी माणसाच्या विजयाचा मेळावा होता,'' असे राज यांनी म्हटले आहे. मग युतीचं काय? असे पत्रकारांकडून विचारण्यात आल्यानंतर, त्यावर त्यांनी युतीच्या चर्चा तुमच्याशी करायच्या का आता? असे उत्तर दिले आहे.

राज यांनी युतीच्या चर्चांवर विचारलेल्या प्रश्नांवर पत्रकारांवर आगपाखड केली आहे. राज ठाकरे यांनी याबाबतचा खुलासा स्वतः X ‍‍‍‍‍वरील पोस्टमधून केला आहे.

राज ठाकरे यांची पोस्ट जशीच्या तशी...

''१४ आणि १५ जुलै २०२५ ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवडक पदाधिकाऱ्यांसाठी इगतपुरी येथे शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. त्या शिबिराच्या दरम्यान माझा पत्रकारांशी अनौपचारिक संवाद झाला. त्या दरम्यान मला ५ जुलैच्या विजयी मेळाव्याबद्दल विचारण्यात आलं. त्यावर मी तो मेळावा राजकीय नव्हता तर तो मराठी माणसाच्या विजयाचा मेळावा होता. त्यावर मग युतीचं काय? असं विचारण्यात आलं, त्यावर मी त्यांना युतीच्या चर्चा तुमच्याशी करायच्या का आता? असं उत्तर दिलं.

त्यानंतर काल काही इंग्रजी आणि मराठी वर्तमानपत्रानी आणि निवडक माध्यमांनी, मी न बोललेले शब्द माझ्या तोंडात घातले की युतीचा निर्णय महापालिका निवडणुकांच्या आधीची परिस्थिती बघून घेतला जाईल. ही कुठली नवीन पत्रकारिता जन्माला आली आहे? अनौपचारिक गप्पा या अनौपचारिक ठेवायच्या असतात, आणि त्यातलं काही प्रसिद्ध केलंच तर जे बोललं नाही ते समोरच्याच्या तोंडात घालायचं नसतं हे भान पण आता गेलं आहे का? कोणाच्यातरी आहारी जाऊन किंवा सांगण्यावरून पत्रकारिता करायची हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडला आहे, हे आमच्या लक्षात येत नाहीये असं समजू नका. तुम्हाला काहीतरी रोज बातम्या हव्यात किंवा कोणाला तरी काही बातम्या हव्यात म्हणून आम्ही काय सतत बोलत राहावं का? आणि आज काही नाही मिळालं तर तयार करा बातम्या, हा कोणता प्रकार आहे पत्रकारितेचा? आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की टाईम्स ऑफ इंडिया सारख्या वर्तमानपत्राने देखील शहानिशा न करता अशी बातमी टाकावी? सोशल मिडीयावर ज्याप्रकारचा धिंगाणा चालू आहे तो प्रकार पत्रकारितेत येऊ नये हीच अपेक्षा!

नशिबाने आजही असे अनेक प्रामाणिक संपादक आणि पत्रकार आहेत ज्यांना मी काय म्हणतोय हे कळत असेल!

पत्रकारितेचा आणि माझा प्रत्यक्ष संबंध हा १९८४ पासून आहे आणि आमच्या घरातच साप्ताहिकं, वर्तमानपत्रं, नियतकालिकं जन्माला आली आहेत. माझाही व्यंगचित्रंकार म्हणून मार्मिक, लोकप्रभा, आवाज, लोकसत्ता ते सामना असा प्रवास झाला आहे, पत्रकारिता ही मी खुप जवळून अनुभवली आहे. त्यामुळे चांगली आणि दर्जेदार पत्रकारिता काय आणि कशी असते याची मला पूर्णपणे कल्पना आहे! त्यामुळे काही मोजक्या पत्रकारांना आणि त्यांच्या संपादकांना माझी विनंती आहे की हे असले प्रकार करू नका.

मला कोणतंही राजकीय विधान करायचं असेल तर मी अधिकृत पत्रकार परिषद घेईन!''

आपला

राज ठाकरे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT