Hindi Language Controversy Maharashtra Pudhari
मुंबई

Hindi Language Controversy Maharashtra: ‘हिंदी लादणाऱ्या सरकारचे कान उपटून दाखवा’; राज ठाकरे यांचा मोहन भागवतांवर जोरदार निशाणा

भाषिक हिंसाचार ‘स्थानिक आजार’ वक्तव्यावरून वादंग; मुख्यमंत्री फडणवीसांचा राज ठाकरेंना पलटवार

पुढारी वृत्तसेवा

हिंदी लादणाऱ्या सरकारचे कान उपटून दाखवा

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाषिक हिंसाचाराच्या घटनांचा स्थानिक आजार असा उल्लेख केल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात नव्या वादंगाला सुरुवात झाली आहे. देशभरात हिंदी लादणाऱ्या सरकारचे कान उपटून दाखवा आणि मग आम्हाला शिकवा, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भागवतांवर निशाणा साधला आहे.

संघाच्या शताब्दीनिमित्त मुंबईत आयोजित दोनदिवसीय व्याख्यानमालेत मोहन भागवत यांनी भाषिक वादावर भाष्य केले होते. भाषिक भेदभाव आणि हिंसाचारच्या घटना या स्थानिक पातळीवर आजारासारख्या असून त्यांना सार्वत्रिक स्वरूप न देता समन्वय आणि सद्भाव कायम ठेवण्याचे आवाहन केले होते. त्यावर, मंगळवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी समाजमाध्यमात पोस्ट करत टीका केली. ते म्हणाले, संघाच्या कामाबद्दल आमच्या मनात आदर आहे, पण म्हणून अप्रत्यक्ष राजकीय भूमिका घेण्याच्या भानगडीत पडू नये आणि पडायचेच असेल तर देशभरात हिंदी लादणाऱ्या सरकारचे कान उपटून दाखवा आणि मग आम्हाला समरसतेच्या गोष्टी शिकवा, असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे. तर, मराठी माणूस सहनशील आहे, यापेक्षा इथले सत्ताधारी लिबलिबित कण्याचे आहेत म्हणून भागवतांची हिंमत होते.

तुमच्या कार्यक्रमाला जी सर्व मंडळी आली होती, ती तुमच्या प्रेमाखातर आली नव्हती, तर ती नरेंद्र मोदी यांच्या सरकारी भीतीमुळे आली होती. आमच्यासाठी मराठी भाषा आणि मराठी माणूस हेच अंतिम सर्वोच्च प्राधान्य आहे, असेही राज ठाकरे यांनी नमूद केले आहे.

संघाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण न मिळाल्याने पोटदुखी

मुंबई : सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुंबईतील दोनदिवसीय कार्यक्रमात उपस्थितांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिले. या उत्तरांनी संघविरोधी प्रचार करणाऱ्यांची दुकाने बंद होणार असल्याने काहींना मळमळ होत आहे. त्यामुळे अनेक जण बोलत असून आम्हाला या कार्यक्रमाला का बोलावले नाही या असूयेतून, पोटदुखीतून विधाने केली जात असल्याचा पलटवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाषिक हिंसाचाराच्या घटनांना स्थानिक आजार असे संबोधले. त्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य भाजप नेत्यांनी समाचार घेतला.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मोहन भागवत यांच्या कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील, जातसमूहातील, उद्योगातील लोकांना निमंत्रित करण्यात आले होते. यातील बहुतांश लोक असे होते ज्यांचा कधी संघाशी संबंध आला नव्हता किंवा ते वेगळ्या विचारांचे होते. आपल्यापेक्षा वेगळ्या विचारांच्या लोकांशी संवाद साधण्याचा किंवा त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न सहसा कोणती संघटना करत नाही. संघाने तो केला हे कौतुकास्पद आहे. या दोन दिवसांत मोहन भागवतांनी केवळ मार्गदर्शनच केले असे नाही, तर आलेल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तर दिली.

संघाला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर समाजातील विविध क्षेत्रांतील लोकांना संघाबाबत स्पष्ट माहिती मिळावी, वाद-अपवाद दूर व्हावेत, यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, असे फडणवीस म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT