मुंबई: साकीनाका येथे मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीच्या दुर्दैवी मृत्यूवर मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम हसल्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खरमरीत पत्र लिहिले आहे. तर उबाठा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी 'मौत के सौदागर' म्हणत घणाघात केला आहे.
राज ठाकरे यांनी थेट फडणवीस यांना पत्र लिहून भाजपच्या असंवेदनशीलतेवर बोट ठेवले आहे. भाजप नेत्यांची वागणूक आणि फडणवीस यांच्या मौनावर राज यांनी ताशेरे ओढले आहेत.
राज यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
तुमचा एक आमदार आणि पदाधिकारी लोकांच्या मृत्यूवर फिदीफिदी हसतो आणि त्यावर कारवाईचा एकही आसूड ओढला जात नाही, हे अत्यंत संतापजनक आहे. आपण सुसंस्कृत आणि संवेदनशील आहात, असे वाटत होते. पण तुमचे मंत्री आणि नेते रोज बेताल विधाने व असंवेदनशीलता दाखवत असताना तुम्ही एकही अवाक्षर बोलत नाही. तुम्ही फक्त स्वकीयांच्या चुकांना पाठीशी घालणारा 'भाऊ' अशी प्रतिमा बनवू नका. अशा बेफाम वागणाऱ्यांकडून राजीनामे घ्या. वेडंवाकडं वागणाऱ्यांना फडणवीस जबर शासन करतात हे एकदा दाखवून द्या, म्हणजे सगळेच सुतासारखे सरळ येतील, अशी आग्रही मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.
‘मौत के सौदागर’, मुंबई भाजपचा क्रूर चेहरा
शिवसेना (उबाठा) नेते खासदार संजय राऊत यांनी अमित साटम यांचा फोटो शेअर करत ‘मौत के सौदागर, मुंबई बीजेपी का क्रूर चेहरा’ असा मजकूर लिहून आपला संताप व्यक्त केला आहे.