Raj Thackeray
मुंबई: २००८ मधील रेल्वे भरती आंदोलनादरम्यान दाखल झालेल्या गुन्ह्यातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ठाणे सत्र न्यायालयाने आज (दि. २१) निर्दोष मुक्तता केली. सरकारी पक्षाला न्यायालयात ठोस पुरावे सादर करता न आल्याने न्यायालयाने हा निर्णय दिला.
२००८ मध्ये झालेल्या रेल्वे भरतीदरम्यान मनसेच्या वतीने परप्रांतीय उमेदवारांविरोधात उग्र आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांना कथितरीत्या चिथावणी दिल्याचा आरोप राज ठाकरे यांच्यावर ठेवण्यात आला होता. याप्रकरणी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाला राज ठाकरे यांच्यावरील गुन्हा सिद्ध करता आला नाही, तसेच त्यांचा या गुन्ह्यातील थेट सहभाग स्पष्ट होईल असे कोणतेही ठोस पुरावे न्यायालयात मांडता आले नाहीत. त्यामुळे पुराव्याभावी राज ठाकरे यांना या प्रकरणातून निर्दोष मुक्त करत असल्याचे ठाणे सत्र न्यायालयाने आपल्या निकालात स्पष्ट केले.
निकालानंतर राज ठाकरे यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला. न्यायालयाबाहेर मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळे ते म्हणाले की, "राज ठाकरे यांना चुकीच्या पद्धतीने आरोपी करण्यात आले होते. आज त्यांच्यासह सात आरोपींची २० वर्षांनी निर्धोष मुक्तता झाली आहे. गुन्हा घडला तेव्हा राज ठाकरे नाशिकला होते. महाराष्ट्रातील तरूणांनी एकत्र येऊन आंदोलन केले होते. २००८ ला गुन्हा घडला आणि २०१३ ला राज ठाकरे यांची चौकशी सुरू झाली होती. त्यामुळे जाणीवपूर्वक त्यांना यामध्ये ओवल होते," असे जाधव यांनी सांगितले.
निकाल दिल्यानंतर राज ठाकरेंना कोर्ट म्हणाले की, या संपूर्ण खटल्याची प्रक्रिया मराठीत झाली. मराठीतच सुनावणी झाली आणि निकालही मराठीतच देणार आहे, हे सर्वात आनंदाची गोष्ट होती, असे अविनाश जाधव म्हणाले. "ही सर्वात मोठी केस होती. त्यातून आज राज ठाकरे यांची निर्दोष मुक्तता झाली. निकालानंतर बाहेर येताना अस्वलाच्या अंगावरचा एक केस कमी झाला, असे राज ठाकरे म्हणाल्याचे अविनाश जाधव यांनी सांगितले.