मुंबई : पुढारी वृत्तसेवा
मुंबई शहर व उपनगरात पावसाळी वातावरण असले तरी पावसाचा जोर कमी आहे. अधून मधून पावसाची एखादी सर पडत आहे. मात्र कुठेही पाणी तुंबलेले नाही. पावसामुळे वाहतूक मात्र काही प्रमाणात मंदावली आहे. पश्चिम द्रुतगती महामार्ग एस. व्ही. रोड, एलबीएस मार्गासह दक्षिण मुंबईतील काही रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईतील अन्य व्यवसाय सुरळीत सुरू आहेत. (Mumbai Rain)
मुंबई शहराला पावसाने अक्षरशः झोडपून काढले होते, मात्र मंगळवारपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र वसई-विरार, कल्याण-डोंबिवली आदी भागात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे उपनगरीय गाड्या १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत आहेत. सायन व माटुंग्याच्या ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेच्या कल्याण सीएसटी मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली होती. काही वेळानंतर येथील अडथळे दूर केल्यानंतर रेल्वेसेवा पूर्ववत सुरू झाली.(Mumbai Rain)
त्यामुळे आज (बुधवार) चाकरमान्यांचा प्रवास लांबला. पावसाळी वातावरण व अधून मधून रिमझिम पाऊस पडत असल्यामुळे गाड्यांचा वेग मंदावला आहे. पश्चिम व पूर्व उपनगरासह शहरातील काही भागात वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे रोजचा प्रवास सुमारे 20 ते 25 मिनिटांनी लांबला आहे. पाऊस कमी असल्यामुळे दादरसह अन्य मार्केटमध्ये ही व्यापारी व नागरिकांची गर्दी दिसून आली.(Mumbai Rain)