'Rainy plan' for railway passengers at Mumbai
मुंबई : पुढारी वृत्तसेवा
पावसामध्ये रेल्वे स्थानकात स्लो झालेली लोकल आणि त्यामुळे प्रवाशांची होणारी दाणादाण या स्थितीवर उपाययोजना म्हणून स्थानिक रेल्वे पोलिसांबरोबर मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने समन्वय साधावा. रेल्वे स्थानकात प्रवाशांची संख्या वाढल्यास कोणताही अनुचित प्रसंग घडू नये म्हणून एक डिझास्टर प्लॅन बनवावा. त्यासाठी बेस्ट बसेसच्या वाहतूक सेवेचीही मदत घ्यावी. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या संबंधित सर्व स्थानकांवर अशी उपाययोजना करावी, असा महत्त्वाचा निर्णय शनिवारी लोकल प्रवाशांसाठी घेण्यात आला.
उपनगर पालकमंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या उपस्थितीत पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयात दोन्ही रेल्वे, महापालिका, मुंबई पोलीस, रेल्वे पोलीस, म्हाडा, एसआरए आणि संबंधित अधिकार्यांची शिनवारी संयुक्त बैठक झाली. या बैठकीत दोन्ही रेल्वेंच्या हद्दीत करण्यात आलेल्या नालेसफाईसह मान्सूनपूर्व कामांचा आढावा घेतला गेला.
या बैठकीस बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी, मुंबई पोलीस आयुक्त, पश्चिम आणि मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक, मुंबई शहर व उपनगर जिल्हाधिकारी, लोहमार्ग पोलीस आयुक्त, म्हाडाचे मुख्याधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच विविध संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
1 मध्य रेल्वेवर 812 कल्व्हर्ट आहेत. त्यापैकी 750 कल्व्हर्टची साफसफाई झालेली आहे. उरलेल्या 62 कल्व्हर्टची साफसफाई नाही.
2 रेल्वे मार्गावरील हद्दीतील 637 धोकादायक झाडांपैकी 550 झाडांच्या फांद्या तोडण्यात आल्या. 87 झाडांच्या अद्याप फांद्या तोडल्याच गेल्या नाहीत.
3 मध्य रेल्वेने गेल्यावेळी 96 ठिकाणी पंप्स इन्स्टॉल केले होते. ते यावेळी वाढवून 177 पंप्स केले. पण नव्या पंप्सचे टेस्टिंग नाही.
4 महानगरपालिकेने रेल्वे हद्दीतील मस्जिद, सँडहर्स्ट रोड दरम्यानच्या 24 धोकादायक इमारती घोषित केल्या आहेत. याबाबत अद्याप निर्णय नाही.
5 मरिन लाईन्स आणि रेल्वेच्या बाहेरचे स्ट्रॉम वॉटर ड्रेन्स आणि कोस्टल रोडच्या कामामध्ये साफ करणारे ड्रेन्स याबाबतच्या प्रशासकीय व्यवस्थांमध्ये समन्वयाची गरज.
रेल्वे प्रशासनाने 36 ठिकाणी पुराचे मोजमाप करणार्या यंत्रणा बसवल्या आहेत. त्यापैकी 5 ऑटोमॅटिक डिजिटल आहेत आणि 12 मॅन्युअल आहेत. त्यांचे को-ऑर्डिनेशन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाशी करणे आवश्यक आहे. कारण रेल्वे ट्रॅकवर पडणारा पाऊस आणि त्याचा निचरा याचे मोजमाप रेल्वे यंत्रणा करते. पण पंप लावून ते पाणी बाहेर टाकणार्या पर्जन्यजलवाहिन्या आणि नाल्यांची व्यवस्था महानगरपालिका करते. त्यामुळे या दोन्ही विभागांच्या वरिष्ठ अधिकार्यांनी समन्वय साधण्याची गरज.
पावसाळ्यात मुंबईकरांची गैरसोय होणार नाही यासाठी समन्वयाने काम करा, ब्लेम गेम करीत बसू नका, मान्सूनपूर्व कामे तातडीने पूर्ण करा, असे निर्देश यावेळी अॅड. आशिष शेलार यांनी बैठकीत दिले. त्यांनी अधिकार्यांसमवेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते भांडुपदरम्यान उपनगरीय रेल्वेतून प्रवास करत प्रत्यक्ष ट्रॅकमध्ये उतरून कामांची पाहणी केली.