मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्यात आता सत्तासंघर्षाचा दुसरा अंक सुरू झाला असून, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर कार्यवाही सुरू करणार आहेत. आपण 16 नव्हे, तर 54 आमदारांना नोटिसा बजावणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून, त्यांना लवकरच नोटिसा पाठवून सात दिवसांत म्हणणे मांडण्यास सांगण्यात येणार आहे.
राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर पुढे काय कार्यवाही करायची, याविषयी बुधवारी बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी दोन्ही गटांकडून राजकीय पक्षाची घटना मागविण्याचा निर्णय घेतला. खरा राजकीय पक्ष कोण? हे तपासण्यासाठी पक्षाच्या घटनेचा अभ्यास करण्यात येणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. 2019 मध्ये शिवसेनेचे जे 54 आमदार निवडून आले होते, त्या सर्वांना नोटिसा बजावण्यात येणार आहेत.
निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानुसार, शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्यात आले आहे. त्यामुळे तो गट आता पक्ष झाला आहे; तर ठाकरेंचा गट हा कमी आमदारांच्या संख्येमुळे गट राहिला आहे. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने विधिमंडळ पक्ष हा राजकीय पक्ष असू शकत नाही, असे म्हटले आहे. त्यानुसार भरत गोगावले यांचे प्रतोदपद चुकीचे असल्याचेही न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे नार्वेकर कोणता निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.