मुंबई : अमेरिका आणि इस्रायलने इराणशी छेडलेले युद्ध, त्यात निर्माण झालेली इंधन टंचाई या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक दुचाकी तयार करणार्या कंपन्यांनी आपले उत्पादन जवळपास दुप्पट करण्याची तयारी सुरू केली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी 1 लाख 50 हजार दुचाकींचे उत्पादन वाढणार असल्याचे सांगण्यात आले. यामध्ये टीव्हीएस मोटार, बजाज ऑटो, अथर एनर्जी, हिरो मोटोकॉर्प या कंपन्यांनी उत्पादन वाढीसाठी तयारी सुरू केली आहे.
ई-बाईक घेण्याकडे कल वाढल्यामुळे कंपन्यांकडून होणारा पुरवठा कमी पडू लागला आहे. परिणामी, नोंदणीनंतर 3 ते 4 महिन्यांनी वाहन ग्राहकांना मिळत आहे. मार्च महिन्यामध्ये ई-दुचाकीची मागणी 9.8 टक्क्यांवर पोहोचली. तब्बल 1 लाख 91 हजार वाहने विकली गेली. गतवर्षीच्या तुलनेमध्ये ई-दुचाकींची विक्री 61 टक्क्यांनी वाढल्याचे सांगण्यात आले. यामध्ये टीव्हीएस कंपनीच्या 40 हजार दुचाकी विकल्या गेल्या. वाढलेली मागणी लक्षात घेऊन या कंपनीने आपले उत्पादन आणखी 50 हजार युनिटने वाढवण्याची तयारी सुरू केली आहे. वर्षभरात टीव्हीएसने 33 टक्क्यांची वाढ नोंदवली.
बजाज अॅटोने नव्याने आणलेले चेतक ई-स्कूटरला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगण्यात आले. मार्चमध्ये 1 लाखांहून अधिक दुचाकी विकल्या गेल्या. बजाज अॅटोने दर महिन्याला 50 हजार ई-दुचाकी तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.