मुंबई

काँग्रेसने वेळोवेळी दलितांना विषारी दात दाखवले : प्रकाश आंबेडकर

दिनेश चोरगे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : १९८२ मध्ये केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना 'दलितांसाठी' हा शब्द वापरू नये, असे निवेदन दिले होते, याचा कदाचित काँग्रेसला विसर पडलेला आहे. २०१० मध्ये, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने पुन्हा नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. पण काँग्रेसने 'हरिजन' हा शब्द का वापरला?  याचे एकच कारण असू शकते आणि ते म्हणजे अहंकार. काँग्रेससारख्या सापाने वेळोवेळी दलितांना आपले खरे विषारी दात दाखवले, असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी (दि.१६) ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.

ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे की, महात्मा गांधींनी अस्पृश्यांसाठी 'हरिजन' हा शब्द वापरण्यास सुरुवात केली, तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी त्यास कडाडून विरोध केला आणि म्हटले की, हा अपमानास्पद आणि फसवा शब्द आहे. जातिवाद आणि अस्पृश्यतेच्या वास्तविक समस्येवर गप्प बसवण्याचा हा प्रयत्न आहे.

ॲड. आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले, दलितांनी आता ठरवले पाहिजे की,  कुटुंबाच्या तालावर नाचणारी कठपुतळी असणाऱ्या काँग्रेसवर विश्वास ठेवायचा की, स्वतंत्र नेतृत्व असलेल्या आंबेडकरवादी पक्षावर, जो कोणत्याही जाणवेधाऱ्यांच्या तालावर कधीही नाचला नाही आणि कधी नाचणार नाही. या पक्षाने  दलित, आदिवासी, मुस्लिम आणि ओबीसींच्या राजकीय हक्कांसाठी काम केले आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT