Sanjay Raut on NCP merger
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाचा विषय हा पवार कुटुंबातील होता. याबाबत शरद पवारांनी मांडलेला मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास नसल्यानेच अजित पवार यांनी याबाबत त्यांच्याशी चर्चा केली नसेल, असा टोला लगावत 'हिंदू संस्कृतीत निधनानंतर १३ दिवसांचा शोक पाळला जातो' असे ते म्हणाले. राष्ट्रवादी हा पक्ष पवारांचा होता, प्रफुल्ल पटेल यांचा नाही. ते नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे भक्त आहेत. अमित शाह त्यांना जे आदेश देतील, तोच निर्णय पटेल घेतील. प्रफुल्ल पटेल यांना पवार कुटुंबाचे मुखिया केले आहे का, असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज (दि. ४) माध्यमांशी बोलताना केला.
भाजप पक्षाच्या कंपनीचे शेअर होल्डर हे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे पक्ष आहेत. अजित पवारांच्या शेवटच्या फोनची ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. हा चौकशीचा विषय आहे. अजित पवार यांनी भाजपचा मुद्दा आपल्यावर थोपवून घेतला नाही. अजित पवार यांनी आपला विचार एकनाथ शिंदे यांच्यासारखा खुंटीला टांगून ठेवला नाही, असेही राऊत म्हणाले.
चंद्रपूर महानगरपालिकेत आम्ही भाजपसोबत जाणार नाही. चर्चा काँग्रेससोबत करा अन्यथा विरोधात बसा, अशी सूचना आम्ही तिथल्या आमच्या लोकांना दिली आहे, असेही राऊत यांनी सांगितले.
प्रफुल्ल पटेल यांचे दोन्ही पाय भाजपमध्ये आहेत. त्यांच्या पक्षातील ९० टक्के लोक वतनदार आहेत. मंत्री मुश्रीफ हल्ली देशाला, महाराष्ट्राला खूप प्रवचन देत असतात. जेव्हा त्यांच्या घरी ईडीचा छापा पडला, तेव्हा तुमच्यासारखे धिप्पड लोक कुठे होते हे राज्याने पाहिलं आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
राहुल गांधी यांनी सांगितले की, एलफिन्स्टन फाईलचे अनेक भाग आमच्याकडे आहेत. त्यानंतर पुढील काही तासांत अमेरिकेबरोबर करार झाले. आपले संरक्षण, आर्थिक, परराष्ट्र धोरण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ठरवत आहेत. अमेरिकेमुळे आपले काहीतरी उघड पडेल असे वाटत आहे. रशियाकडून तेल घ्यायचे नाही, असा इशारा अमेरिकेने दिला आहे. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ५६ इंच छाती कोठे झुकली होती, असा सवालही राऊत यांनी केला.
अमेरिकेबरोबर झालेल्या कराराबाबत मंत्री पीयूष गोयल खोटं बोलत आहेत. आता भारतीय शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय मार्ग नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या भीतीने हा करार केला आहे? मनमोहन सिंग यांच्या काळात अडीच टक्के सुद्धा टॅरिफ नव्हते. महान भारताला यांनी खड्ड्यात घातले आहे, अशी टीकाही राऊत यांनी केली.