पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला बुधवारी दुपारी बॉम्बने उडवून धमकी (Mumbai airport gets bomb threat) देण्यात आली आहे. हा धमकीचा कॉल केंद्रीय औद्याोगिक सुरक्षा दलाच्या (CISF) नियंत्रण कक्षाला आला होता. कॉल करणाऱ्याने मोहम्मद नावाच्या व्यक्तीचा उल्लेख केला. जो कथितरित्या मुंबईहून अझरबैजानला जाणाऱ्या विमानातून स्फोटके घेऊन जात आहे.
याची दखल घेत सीआयएसएफने तात्काळ सहार पोलिसांना याबाबत सतर्क केले. यामुळे विमानतळ परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कसून तपासणी केली जात आहे. एअरलाइन्सना मिळणाऱ्या धमक्यांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) देशभरात सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे.
ऑक्टोबरमध्ये सुमारे ४५० अफवा पसरवणारे कॉल्स आले होते. यामुळे प्रवाशांच्या आणि देशाच्या सुरक्षेच्या संभाव्य परिणामांबाबत भीती निर्माण झाली होती. या वाढत्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर NIA च्या सायबर शाखेने या परदेशी धमकीच्या कॉल्सचे सर्वसमावेशक विश्लेषण सुरू केले आहे. या कॉल्समागील नेमका हेतू काय? हे जाणून घेणे आणि त्यांच्या सत्यतेचे मूल्यांकन करण्यावर हा तपास केंद्रित आहे.
अनेक धमकीचे फोन येत असल्याच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) ऑक्टोबरमध्ये सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी एक ॲडव्हाजरी जारी केली होती. त्यांना माहिती तंत्रज्ञान (IT) नियम आणि भारतीय न्याय संहिता (भारतीय न्याय संहिता) च्या तरतुदींचे पालन करण्यास सांगण्यात आले होते. बॉम्बच्या धमकीच्या पोस्ट तत्त्काळ काढून टाकण्यासाठी योग्य प्रयत्न करावेत अन्यथा जबाबदार धरले जाईल, असा इशारही दिला होता.