मुंबई : पुढारी वृत्तसेवा राज्यात आतापर्यंत सरासरीच्या 81.07 टक्के पाऊस झाला असून, कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. राज्यात 1 ते 6 सप्टेंबरदरम्यान केवळ 24.05 म्हणजे सरासरी 13.60 टक्के पाऊस पडला आहे. 2579 पैकी 446 महसुली भागात 21 दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड पडला असल्याचे मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या आढावावेळी स्पष्ट झाले आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, नियमानुसार पीक विम्याचा अग्रीम, पिण्याचे पाणी, चारा उपलब्धता यासाठी काटेकोर नियोजन आवश्यक आहे. पावसाअभावी पिण्यासाठी पाणी राखीव ठेवण्यास शासनाचे प्राधान्य आहे. पीक विम्याची अग्रीम रक्कम कशी देता येईल, याचे चांगले नियोजन करावे. किती नुकसान झाले आहे हे अचूकरीत्या काढणे, यंत्रणांमध्ये समन्वय राहील हे पाहण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. पिण्याच्या पाण्याचे आरक्षण महत्त्वाचे आहे. कोणत्याही परिस्थितीत शेतकर्यांना मदत करण्यास प्राधान्य असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात दरवर्षीप्रमाणे मान्सूनचे आगमन 7 ऐवजी 11 जून रोजी कोकणातच झाले आहे. इतर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. 5 सप्टेंबरपर्यंत 31 तालुक्यात 25 ते 50 टक्क्यापर्यंत पाऊस झाला आहे. अशा परिस्थिमुळे दुष्काळ राज्याच्या वेशीवर आला असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. 1 जून ते 5 सप्टेंबरपर्यंत केवळ 59 दिवस पाऊस पडला आहे. परंतु त्याचे प्रमाण अवघे 2.5 मिलीमीटर राहिले आहे.