केंद्रीय मंत्री पीयूष गोयल  File Photo
मुंबई

NCP president controversy |राष्ट्रवादीबाबत केलेल्या 'त्या' विधानावर केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी मागितली माफी

चुकीच्या माहितीच्या आधारावर विधान केल्याचे सांगत वादावर टाकला पडदा

पुढारी वृत्तसेवा

प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्त झाले आहेत, असा दावा केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी केला होता. त्यावरून एकच गदारोळ सुरू झाला, तर दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण आजच्या घडीला तरी शक्य नसल्याचेही गोयल यांनी म्हटले होते.

NCP president controversy

नवी दिल्ली : प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्त झाले आहेत, असा दावा केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी केला होता. आता त्यांनी आपण चुकीच्या माहितीच्या आधारावर हे विधान केल्याचे म्हणत माफी मागत आपल्या विधानावर पडदा टाकला आहे.

माहितीची पडताळणी न करता मी माध्यमांना निवेदन दिले : गोयल

राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या वक्तव्यावर मंत्री पीयूष गोयल यांनी दिलगिरी व्यक्त केली . त्यांनी म्हटले की, "प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत, अशी चुकीची माहिती एका ज्येष्ठ पत्रकाराने मला दिल्याचे पीयूष गोयल यांनी सांगितले. माहितीची पडताळणी न करता मी माध्यमांना निवेदन दिले, पण नंतर मला कळले की ती माहिती चुकीची आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. दिशाभूल करणाऱ्या माहितीबद्दल मी माफी मागतो," असे पीयूष गोयल यांनी म्हटले आहे.

निर्णयाचा अंतिम अधिकार सुनेत्रा वहिनींकडेच

याबाबत 'पुढारी न्‍यूज'शी बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, आपल्या विधानाबाबत पीयूष गोयल यांनी माफी मागितलेली आहे. त्यांना एका ज्येष्ठ पत्रकाराने चुकीची माहिती दिल्यानंतर त्यांनी 'पीटीआय'ला दिलेल्या मुलाखती संदर्भातील आपला मुद्दा खोडून काढला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा स्वतंत्र पक्ष आहे. अजितदादा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते.दुर्दैवाने ते आज आमच्यामध्ये हयात नाहीत. काल विधिमंडळ गटनेतेपदी निवड करताना सर्व आमदारांनी विधिमंडळात एकमुखाने सुनेत्रा वहिनींची निवड केली आहे. त्याचबरोबर 'राष्ट्रीय अध्यक्ष सुद्धा सुनेत्रा वहिनी झाल्या पाहिजेत' या संदर्भात सुद्धा स्वाक्षऱ्या केल्या आहेत. आता दशक्रिया विधी आटोपल्यानंतर एकदा त्यांच्याकडे पदभार आला की, त्या अंतिम निर्णय राष्ट्रीय अध्यक्ष आणि विधिमंडळ गटनेत्या म्हणून घेतील. पक्षाच्या संदर्भात निर्णय घेण्याचे सर्व अधिकार आदरणीय सुनेत्रा वहिनींकडे असतील, त्यामुळे त्या स्वतःच बोलतील.

देवेंद्र फडणवीस सुनेत्रा वहिनींच्या पाठीशी भावाप्रमाणे उभे आहेत

राहिला प्रश्न देवेंद्रजींचा, तर मला त्यांच्या एका गोष्टीचे खरोखर अपरूप वाटते, कौतुक करावेसे वाटते की, अशा कठीण परिस्थितीत सुनेत्रा वहिनींच्या पाठीशी एका भावाप्रमाणे ते खंबीरपणे उभे आहेत. त्यांना माहित आहे की हा प्रसंग विलीनीकरणाच्या चर्चा करण्याचा नाही. तूर्तास सुनेत्रा वहिनी यावर भाष्य करत नाहीत तोपर्यंत आम्ही काही बोलणार नाही आणि अंतिम निर्णय सुनेत्रा वहिनी घेतील, असेही मिटकरी यांनी स्पष्ट केले.

प्रफुल्ल पटेल यांनीही दिला चर्चेला पूर्णविराम

राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याच्या चर्चांना खुद्द प्रफुल्ल पटेल यांनीच पूर्णविराम दिला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करत त्यांनी सर्व बातम्या केवळ अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे. प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी माझ्या नियुक्तीबाबतची बातमी मी पाहिली. या बातम्या पूर्णपणे निराधार असून त्यात कुठलेही तथ्य नाही. लोकशाही मार्गानेच निर्णय होणार. राष्ट्रवादी काँग्रेस हा लोकशाही मानणारा पक्ष आहे. महत्त्वाच्या पदाचा निर्णय आमचे ज्येष्ठ नेते, आमदार आणि पदाधिकारी यांच्याशी चर्चा करूनच घेतला जातो. आमचा पक्ष सर्व सदस्यांच्या भावनांचा आदर करतो. राष्ट्रीय पक्ष म्हणून अशा बाबींमध्ये आम्ही प्रस्थापित प्रक्रियेचेच पालन करतो."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT