मुंबई : कबुतखान्यांना नियंत्रित वेळेत खाद्य पुरविण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने निर्देश दिल्याने महापालिकेने त्यानुसार कार्यवाही करुन, मुंबईत जी दक्षिण विभागातील वरळी जलाशय (वरळी रिझर्व्हयर), के पश्चिम विभागात खारफुटी परिसर, लोखंडवाला बॅक रोड, वेसावे एसटीपी प्रकल्पाजवळ, अंधेरी पश्चिम, टी विभागात खाडीकडील परिसर, जुना ऐरोली - मुलुंड जकात नाका, ऐरोली मुलुंड जोड रस्ता, मुलुंड (पूर्व), आणि आर मध्य विभागात गोराई मैदान, बोरिवली (पश्चिम) या चार नवीन ठिकाणी कबुतरखान्यांसाठी परवानगी देण्याचा अंतरिम निर्णय घेतला आहे. मात्र विद्यमान कबुतरखाने सुरू करण्यास परवानगी दिलेली नाही. जे कबुतरखाने बंद आहेत, ते बंदच राहतील, असे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
या चारही ठिकाणी कबुतरांना फक्त सकाळी ७ ते ९ या दोन तासांच्या कालावधीतच नियंत्रितपणे कबुतरांना दाणे पुरवता येतील. अन्य कोणत्याही वेळेत दाणे पुरवता येणार नाहीत. या चारही जागांवर कबुतरखान्याचे व्यवस्थापन करण्यासाठी स्वयंसेवी संस्था पुढे आली तरच ही परवानगी देण्यात येईल असेही पालिकेने स्पष्ट केले आहे.
कबुतरांना दाणे पुरवल्यामुळे वाहने व पादचारी यांना अडथळा होऊ नये, कबुतरखान्याच्या जागी संपूर्ण स्वच्छता राखणे, नागरिकांच्या तक्रारी आल्यास त्यांची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करणे, या सर्व बाबींची दक्षता संबंधित संस्थेला घ्यावी लागेल. त्याअनुषंगाने संस्थेकडून प्रतिज्ञापत्र देखील घेतले जाणार आहे. कबुतरखान्यांच्या या व्यवस्थापनामध्ये संबंधित प्रशासकीय विभागांचे सहायक आयुक्त हे समन्वय अधिकारी (नोडल पर) असतील. या कबुतरखान्यांच्या पुजरात आरोग्याविषयी जनजागृतीकरिता फलकही लावण्यात येतील.
९ हजार ७७९ सूचना, हरकती, तक्रारी
कबुतरखान्यांबाबत नागरिकांकडून महानगरपालिकेकडे एकूण ९ हजार ७७९ सूचना व हरकती, तक्रारी आदी प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये कबुतरखाना बंद करणे, सुरु ठेवणे, स्वच्छता राखणे, नियंत्रित पद्धतीने दाणे पुरवणे अशा सर्व पैलूंचा समावेश आहे. कबुतरखान्यांबाबत तज्ज्ञ समितीचा अहवाल व न्यायालयाचे आदेश येईपर्यंत, अंतरिम कार्यवाही म्हणून महानगरपालिकेने या नवीन जागांना परवानगी दिली आहे.
♡