मुंबई; पुढारी वृत्तसेवा : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा, (जि रायगड) या प्रतिष्ठानच्यावतीने पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आणि डॉ. सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेशाचे विसर्जन करताना निर्माल्य गोळा करण्याचं कार्य पार पडलं. हे निर्माल्याचं मशिनद्वारे भुसा तयार करून त्याचा वापर सेंद्रीय खतनिर्मितीसाठी करण्यात येणार आहे. निर्माल्यापासून खतनिर्मितीचा हा उपक्रम मुंबईतील जुहू चौपाटी, गिरगांव चौपाटी, बोरिवली नॅशनल पार्क येथे गणेश भक्तांच्या उपस्थितीत पार पडला. गिरगांव चौपाटी येथे नऊ हजार स्वयंसेवक कार्यरत होते. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आवर्जून उपस्थिती दर्शवली.
या उपक्रमामुळे खतंही मिळतं आणि निर्माल्यही नष्ट केलं जातं. ते समुद्रात जात नाही. अशाप्रकारे पर्यावरणाचाही समतोलही राखला जातो. त्यामुळे हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे आणि गेली अनेक वर्षे हा उपक्रम डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे सुरू आहे. पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी हे तर स्वच्छता मोहिमेचे ब्रॅण्ड अम्बेसिडर आहेत. त्याच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण, स्वच्छता मोहिम, विहीर- तलाव साफसफाई मोहिम, रक्तदानशिबीर असे विविध लोकउपयोगी उपक्रम देशभर राबवले जातात. बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात या निर्माल्यातून खतनिर्मिती करण्यात येणार आहे. साधारण ४०-५० टन निर्माल्य यातून जमा करण्यात आलं आहे.
आपल्या देशासाठी आपण काहीतरी देणं लागतो. या भावनेने लाखो स्वयंसेवक हा उपक्रम गेले अनेक वर्षे राबवत आहेत आणि असा उपक्रम शासनातर्फेदेखील देशातही राबवण्याचा आम्ही नक्की विचार करू, असं या कार्यक्रमावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.