म्हाडाकडून निर्मलनगरवासीयांची फसवणूक ! File Photo
मुंबई

म्हाडाकडून निर्मलनगरवासीयांची फसवणूक !

घरे देण्याच्या आश्वासनाचा लेखी आदेशच नाही

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : नमिता धुरी

वांद्रे येथील निर्मलनगर संक्रमण शिबिरातील रहिवाशांना त्याच ठिकाणी पुनर्वसित इमारतीमध्ये मालकी हकाने घरे देण्याचे आश्वासन म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिले होते; मात्र या आश्वासनाचा कोणताही लेखी पुरावा उपलब्ध नाही. त्यामुळे म्हाडाने निर्मलनगरवासीयांची फसवणूक केल्याची शंका घ्यायला वाव आहे.

निर्मलनगर संक्रमण शिबिरातील दोन इमारतींचा पुनर्विकास केला जात आहे. यासाठी येथील रहिवाशांना घरे रिकामी करण्यास म्हाडाने भाग पाडले. वर्षानुवर्षे निर्मलनगरमध्ये राहिल्यानंतर आता त्याच ठिकाणी मालकी हक्काने घरे मिळावीत यासाठी रहिवाशांनी आंदोलन केले. नवीन वर्षाच्या दुसऱ्याच दिवशी म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी रहिवाशांचे प्रतिनिधी आणि संबंधित म्हाता अधिकाऱ्यांसह बैठक घेतली. रहिवाशांना संक्रमण शिबिराच्या पुनर्वसित इमारतीमध्ये मालकी हक्काने घरे मिळतील, असे आश्वासन उपाध्यक्षांनी बैठकीत दिले होते. त्यामुळे रहिवाशांचा विरोध शमला, मात्र लेखी आदेश न मिळाल्याने त्यांनी विकासकाकडून भाडे घेतले नाही. स्वतःच्या राहण्याची व्यवस्था स्वतःच केली. बैठक होऊन १ महिना उलटला तरी अद्याप उपाध्यक्षांच्या आश्वासनाचा लेखी पुरावा उपलब्ध झालेला नाही. रहिवाशांना बैठकीचे मिनिट्स उपलब्ध झालेले नाही.

इमारती दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या मख्य अधिकान्यांना यावायत विचारले असता, निर्णयाबाबत माहिती घेऊन कळवतो असे त्यांनी सांगितले; मात्र तसे काहीही कळवले नाही. संक्रमण शिबिराच्या उपमुख्य अधिकान्यांशी गुरुवारी संपर्क साधला असता, 'उद्याच मिनिट्सवर उपाध्यक्षांची स्वाक्षरी घेतो', असे त्यांनी सांगितले. तसेच त्रिपक्षीय कराराची मागणी उपाध्यक्षांनी अमान्य केल्याचीही माहिती त्यांनी दिली. 'दै. पुढारी'च्या प्रतिनिधींनी उपाध्यक्षांच्या भेटीसाठी ईमेल केला असता गेल्या दोन महिन्यांत त्यांनी प्रतिसाद दिलेला नाही. भावनांशी खेळ, अधांतरी भविष्य निर्मलनगर संक्रमण शिबिरात राहणाऱ्या काही रहिवाशांची मूळ घरे दक्षिण मुंबईत विविध ठिकाणी होती. त्या इमारती धोकादायक झाल्याने त्यांना निर्मलनगरमध्ये तात्पुरत्या स्वरुपात घरे देण्यात आली. मूळ इमारतीचा पुनर्विकास न झाल्याने हे रहिवासी ३० ते ४० वर्षे संक्रमण शिबिरातच राहात आहेत. मूळ इमारतीचा पुनर्विकास नाही, राहत्या घरावर मालकी हक्क नाही, अशा स्थितीत रहिवाशांचे भविष्य अधांतरी आहे. निर्मलनगरची घरे रिकामी करण्याची रहिवाशांची तयारी नव्हती. अशा वेळी पोलीस फौजफाटा आणून म्हाडा अधिकाऱ्यांनी घरे रिकामी करून घेतली. नवीन इमारत उभी राहिल्यावर त्याच ठिकाणी मालकी हक्काने घर मिळावे, यासाठी रहिवाशांनी आंदोलन केले. त्यानंतर झालेल्या बैठकीत अ गटातील म्हणजेच मूळ भाडेकरूंना मालकी हक्काने परे देण्याचे आश्वासन उपाध्यक्षांनी दिले. त्याचा लेखी आदेश न काढून म्हाडा अधिकारी रहिवाशांच्या भावनांशी खेळ करत आहेत.

निर्मलनगर संक्रमण शिबिराच्या पुनर्वसित इमारतीत मालकी हक्काने घरे देण्याची मागणी घेऊन आम्ही उपाध्यक्षांना भेटलो. त्यांनी बृहतसूचीमध्ये अर्ज करा किंवा निर्मलनगरमध्ये मालकी हकाने परे घ्या, असे दोन पर्याय दिले होते. आमच्या मूळ इमारतींचा पुनर्विकास झाल्यास ३०० चौरस फुटांपेक्षा मोठे घर मिळणार होते. त्यामु‌ळे निर्मलनगरमध्येही मोठे घर मिळावे, या आमच्या मागणीवर त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. तसेथ म्हाडा, विकासक आणि रहिवासी असा त्रिपक्षीय करार करावा, अशी मागणी होती; मात्र म्हाडा आणि विकासक यांच्यात करार होईल व रहिवाशांना घरे देण्याची तरतूद त्या करारात असेल, असे आश्वासन उपाध्यक्षांनी दिले होते. बैठकीचे मिनिट्स अद्याप उपलब्ध झालेले नाहीत. मिनिट्सवर उपाध्यक्षांची स्वाक्षरी झाली नसल्याचे म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी १५ दिवसांपूर्वी सांगितले होते. गुरुवारी 'दै. पुढारी'च्या प्रतिनिधींशी बोलणे झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी माझ्याशी संपर्क साधून शुक्रवारी उपाध्यक्षांची स्वाक्षरी घेणार असल्याचे सांगितले. - मनमोहन चोणकर, रहिवासी, निर्मलनगर संक्रमण शिबीर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT