पुढारी ऑनलाईन डेस्क : महिलांना प्रतिमहिना केवळ १५०० रुपये देऊन थांबायचे नाही. तर त्याचा योग्य विनियोग करून महिलांनी व्यावसायिक होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी आम्ही प्रयत्न करू, प्रत्येक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करून कुठल्याही क्षेत्रात महिला मागे राहणार नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे. स्त्रियांना मान देणे हे आपले कर्तव्य आहे. स्त्री- पुरुष भेद करता कामा नये. येत्या पिढीत स्त्री बाबत सन्मानाची भावना निर्माण करावी लागेल. महिलांवरील हिंसाचार कमी करण्यासाठी समाजात मूल्य रुजवावी लागतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले. (Women's Day 2025)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्यासमवेत राज्यस्तरीय 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' समारोप कार्यक्रमात 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' अभियानाची प्रतिज्ञा घेतली. यावेळी ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, 'बेटी बचाओ व बेटी पढाओ', या उपक्रमाने स्त्री भ्रूण नष्ट करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. ज्या जिल्ह्यात विषमता आहे, तिथे मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाही. त्यातून कळते कसा मूर्खपणा आपण करून ठेवला आहे. ज्या जिल्ह्यात मुलींची संख्या कमी आहे, तिथे सुधारणा सुरु केल्या आहेत.
मी सुद्धा एका मुलीचा बाप आहे. त्यामुळे मला अनुभव येतोय की, मुली या मुलांपेक्षा कशा चांगल्या असतात. महिलांची ही शक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ओळखली व सगळ्या संरक्षण क्षेत्रात महिलांना संधी दिली. आमच्या सारख्या पुरुषांना आता भीती आहे की, राजकारणात आता ३३ टक्के महिलांना २०२९ पासून संधी असेल. या देशात महिलांचे राज्य असेल. याचा मला आनंद आहे.