मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावरून दावे-प्रतिदावे सुरू असताना अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या 30 आमदारांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची नियुक्ती करावी, अशा विनंतीचे पत्र पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांना दिले आहे. अजितदादांच्या निधनानंतर विलीनीकरणाचे मौखिक पुरावे देणार्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला हा दुसरा हादरा असल्याचे बोलले जाते.
विशेष म्हणजे सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड प्रक्रिया शनिवारी विधान भवनात सुरू असताना त्याच दिवशी काही आमदारांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाबातच्या विनंती पत्रावर आमदारांच्या सह्या घेण्यास सुरुवात केली होती. हे पत्र सोमवारी पटेल आणि तटकरे यांना पाठविण्यात आले आहे. पक्षाच्या युवक, विद्यार्थी, सांस्कृतिक इत्यादी विविध सेलच्या अध्यक्षांच्याही या पत्रावर स्वाक्षर्या आहेत.
आमदारांचे पत्र
अजितदादा पवार यांच्या निधनामुळे पक्षावर मोठा आघात झाला आहे. अशा कठीण परिस्थितीत पक्षाला संघटित ठेवण्यासाठी शांत, सक्षम आणि विश्वासार्ह नेतृत्वाची नितांत गरज आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारून पक्ष आणि महाराष्ट्राप्रती आपली निष्ठा सिद्ध केली आहे. त्यांचा अनुभव, पक्षाशी असलेली निष्ठा आणि कार्यकर्त्यांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी त्या पूर्णपणे योग्य आहेत.