कोपरखैरणे: नवी मुंबई महापालिका मुख्यालयासमोरील उड्डाणपुलाखाली एका व्यक्तीची ठेचून हत्या झाल्याची घटना 17 एप्रिलला समोर आली होती. पोलिसांनी आठ दिवसांत या गुन्ह्यांची उकल करण्यात यश मिळवले आहे. किरकोळ वादातून मित्राची दगडाने ठेचून केली हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आले असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे.
17 एप्रिल रोजी पहाटे नवी मुंबई महापालिकेसमोरील उड्डाणपुलाखाली एक मृतदेह आढळला होता. त्याला दगडाने ठेचून मारण्यात आले होते. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद करून तपास चक्रे फिरवली. यातील मयत व्यक्तीची ओळख पटवण्यात यश आले असून आकाश प्रकाश राठोड (वय 31) असे त्याचे नाव आहे.
तांत्रिक तपासात सुभाष छन्नूलाल ध्रुवे (वय 27) हे नाव समोर आले. त्याला याच परिसरातून शनिवारी अटक करण्यात आली. त्याने हत्येची कबुली दिली असून यात आणखी एका आरोपीचा समावेश आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत.
क्षुल्लक कारणावरून हत्या
ज्याची हत्या झाली तो आकाश राठोड, त्याला ठार मारणारा सुभाष ध्रुवे आणि अन्य एक हे तिघेही अनेक वर्षांपासून मित्र आहेत. तिघांनाही दारूचे व्यसन होते. मिळेल ते काम करून जेवण आणि दारूचे पैसे जमले कि पीत बसायचे, असा अनेक महिन्यांपासून त्यांचा दिनक्रम होता. त्यांच्यात किरकोळ कारणांनी अनेकदा हाणामारीही झाली होती.
17 तारखेला ते नेहमीप्रमाणे उड्डाणपुलाखाली दारू पीत बसले होते. यथेच्छ मद्यप्राशन केल्यावर त्यांनी सोबत आणलेले जेवण करण्यास सुरवात केली. मात्र जेवणावरून वाद सुरु झाले. त्यात सुभाष आणि अन्य एकाने मिळून आकाशला बेदम मारले. त्यांचा राग शांत न झाल्याने त्यांनी तिथेच पडलेल्या दगडांनी त्याच्यावर मारा केला. त्यातच आकाश याचा मृत्यू झाला.