नवी मुंबई : वृत्तसंस्था
शासकीय कामांची थकबाकी आणि थकीत बिले न मिळाल्यामुळे निर्माण झालेल्या तीव्र आर्थिक विवंचनेतून गजानन देवकाते (वय ३७) या मराठी कंत्राटदाराने नवी मुंबईतील उलवे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. थकलेले दोन कोटी रुपयांचे बिल मिळावे, यासाठी वारंवार मागणी करून, विनंती करूनही त्याकडे मुंबई महापालिका, शासनाचे इतर विभाग यांनी दुर्लक्ष केल्याने अखेर निराश झालेल्या देवकाते यांनी आपले जीवन संपविल्याने हळहळ आणि शासनाविषयी संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. दुसरीकडे, राज्यातील विरोधी पक्षांनीही सरकारवर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उलवे येथील ‘शगुन पॅराडाईज’ इमारतीतील फ्लॅटमध्ये मंगळवारी संध्याकाळी गजानन देवकाते यांनी आत्महत्या केली. उलवे पोलिसांनी याप्रकरणी अकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
महाराष्ट्र राज्य कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. पत्रात म्हटले आहे की, देवकाते यांनी पूर्ण केलेल्या शासकीय कामांचे सुमारे २ कोटी रुपये थकले होते. हे बिल मंजूर करून मिळवण्यासाठी त्यांनी संबंधित कार्यकारी अभियंत्यांकडे अनेकदा फेऱ्या मारल्या होत्या.
वारंवार विनंत्या करूनही बिले न मिळाल्याने देवकाते हे प्रचंड आर्थिक अडचणीत आणि तीव्र मानसिक तणावाखाली होते. या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करून त्वरित चौकशी न लावल्यास राज्यभरात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा भोसले यांनी दिला आहे.
सांगलीतही वर्षभरापूर्वी कंत्राटदाराने जीवन संपवले
सांगली जिल्ह्यातील तांदूळवाडी येथील जलजीवन मिशनचे कंत्राटदार हर्षल पाटील (वय ३५) यांनी २२ जुलै २०२५ रोजी स्वतःच्या शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांची शासनाकडे जवळपास १ कोटी ४० लाख रुपयांची देयके (बिले) प्रलंबित होती. हर्षल यांनी सावकार, नातेवाईक, मित्र आदींकडून जवळपास ६५ लाखांचे कर्ज घेतले होते. शासनाकडून पैसे वेळेत न मिळाल्याने ते तणावात होते. ‘मी आत्महत्या करतो, हे शासन पैसे देत नाही. मी कामासाठी घेतलेली देणी कशी भागवू? वडिलांना काय सांगू नका,’ असे ते मित्रांना सांगत होते. शेवटी देयके न मिळाल्याने त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, दोन भाऊ, आई, वडील असा परिवार आहे.
सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : आ. रोहित पवार
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी गुजरात आणि आंध्र प्रदेशच्या कंत्राटदारांची बिले तातडीने मंजूर केली जातात, तर मराठी कंत्राटदारांची बिले वर्षानुवर्षे रोखून त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केले जात आहे. आतापर्यंत ६ कंत्राटदारांनी आत्महत्या केल्याचा दावा करत सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
शासनाकडून आपण केलेल्या कामाची बिले मिळत नाहीत. त्यामुळे कठीण आर्थिक परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा कठीण स्थितीत आत्महत्या हा मार्ग नाही; हक्क, अस्तित्व आणि कुटुंबासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे.मिलिंद भोसले, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कंत्राटदार संघटना