नवी मुंबई: नवी मुंबई महापालिका निवडणुका होऊन सुमारे पाच महिने उलटले असतानाही अनेक प्रभागांतील नागरिकांना मूलभूत सुविधांच्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे.
मान्सून सुरू होण्याआधी प्रभागातील रस्त्यांवरील खड्डे, पाणीपुरवठ्याच्या तक्रारी, सांडपाणी व्यवस्थेतील त्रुटी, अनधिकृत पार्किंग व स्वच्छतेच्या प्रश्नांवर ठोस उपाययोजना अपेक्षित असताना नवी मुंबईतील काही नगरसेवकांकडून मात्र प्रत्यक्ष कामापेक्षा प्रसिद्धीवर अधिक भर दिला जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
सध्या सोशल मीडियाच्या युगात अनेक नगरसेवक विविध भागांत पाहणी दौरे करतानाचे व्हिडीओ, उडत्या चालीच्या गाण्यांच्या पार्श्वभूमीवर तयार केलेले रिल्स आणि आकर्षक दृश्यफिती मोठ्या प्रमाणावर प्रसारित करत आहेत.
या व्हिडीओंना हजारो व्ह्यूज व लाईक्स मिळत असले तरी प्रत्यक्षात नागरिकांच्या समस्या कितपत मार्गी लागत आहेत, असा सवाल सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे. सोशल मीडिया हा जनसंपर्काचा प्रभावी माध्यम असले तरी नागरिकांच्या समस्या किती वेगाने व प्रभावीपणे सोडवल्या जातात यावरच विकास ठरत असतो. त्यामुळे प्रसिद्धी व प्रत्यक्ष काम यामध्ये समतोल राखणे आवश्यक आहे.
रिल्स बनवण्याकडे अधिक कल
विविध ठिकाणी पाहणी दौरे व सोशल मीडिया पोस्ट यापलीकडे जाऊन प्रश्नांच्या निराकरणासाठी संबंधित विभागांशी पाठपुरावा, निधी उपलब्ध करून देणे व कामे पूर्ण होईपर्यंत सातत्याने लक्ष ठेवणे ही लोकप्रतिनिधींची खरी जबाबदारी आहे. मात्र काही ठिकाणी केवळ कॅमेऱ्यासमोर पाहणी करून त्याचे रिल्स बनवण्याकडे अधिक कल दिसून येत असल्याची टीका होत आहे.