नवी मुंबई: काही दिवस सतत सुरू असलेल्या पावसाचा परिणाम भाजीपाल्याच्या घाऊक बाजारावर पाहायला मिळत आहे. गेल्या आठवडाभरापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे,सातारा,सांगली,नाशिक,अहिल्यानगर, सोलापूरसह इतर जिल्ह्यातून एपीएमसी घाऊक बाजारात येणाऱ्या भाजीपाल्याच्या गाड्यांची संख्या जेमतेम अडीचवर आली आहे. यामुळे निम्मी आवक कमी झाली.
पावसामुळे बाजारात माल खरेदी करण्यासाठी मुंबईसह उपनगरातील किरकोळ व्यापाऱ्यांना येणे कठीण होत असल्याने भाजीपाल्याला हवा तसा उठाव गेल्या आठवडय़ात मिळाला नाही. यामुळे घाऊक बाजारात भाज्यांचे दर काही प्रमाणात कमी झाले आहेत, किरकोळ बाजारात मात्र भाज्यांचा तुटवडा असल्याने दर वीस ते पंचवीस टक्क्यांनी वाढल्याचे चित्र आहे. तर कोथिंबीर किरकोळ बाजारात ऐंशी ते शंभर रुपये जोडी विकली जाते. एकंदरीत पावसाचा भाजीपाला बाजारावर परिणाम झाला असून आवक मंदावली, उठावही कमी झाल्याचे समोर येत आहे.
वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक भाजीपाला बाजारात दररोज सरासरी ६०० ते ६५० गाड्या भाजीपाल्याची आवक होत असते. मात्र सध्या पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे भाज्यांच्या गाड्या बाजारापर्यंत वेळेवर पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे बाजारात दररोज सरासरी ५०० गाड्या भाज्या येत आहेत. भाजीपाल्याची आवक कमी होत आहे. मात्र बाजारात भाजीपाल्याला हवा तसा उठाव मिळत नाही. परिणामी, घाऊक बाजारात भाजीपाल्याचे दर मागच्या महिन्याच्या तुलनेने २०-२५ टक्क्यांनी घसरले आहेत.
पावसामुळे भाजीपाल्याला हवा तसा उठाव मिळत नाही. परंतु, मुंबई आणि उपनगरांतील व्यापारी पावसामुळे बाजारात खरेदीसाठी येऊ शकत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे भाज्यांचे दर खाली आले आहेत, अशी माहिती घाऊक व्यापाऱ्यांनी दिली आहे. घाऊक बाजारात ही परिस्थिती असताना किरकोळ बाजारात भाज्या कमी येत आहेत. त्यामुळे भाज्यांचे भाव चढे असल्याची परिस्थिती आहे.
पाऊस असल्याने पावसात पदपथांवर बसणारे भाजीवाले विक्रीसाठी बसत नाहीत. त्यामुळे बाजारात भाज्यांची कमतरता जाणवते. त्यानुसार किरकोळ बाजारात भाज्या कमी असून, त्यामुळे किरकोळ बाजारात भाज्या महागल्या आहेत. सर्व भाज्या ८० ते १०० रुपये किलोच्या घरात आहेत. मात्र ग्राहकांना पर्याय कमी असल्याने चढ्या दराने भाज्या खरेदी कराव्या लागत आहेत.
किरकोळ बाजारात अशी माहिती घाऊक व्यापाऱ्यांकडून देण्यात आली आहे. पावसाने भिजलेला भाजीपाला बाजारात शेतात, भाज्यांच्या मळ्यात पावसाचे पाणी गेल्याने भाजीपाल्याचे बरेच नुकसान झाले आहे. पुढने काही दिवस भाज्यांचे उत्पादन घटणार आहे. पावसामुळे पूर्णपणे भिजलेला भाजीपाला बाजारात दाखल होत आहे. हा माल बाजारात जास्त वेळ टिकणारा नाही. यात जास्त पालेभाज्यांचे प्रमाण आहे, त्यामुळे पालेभाज्यांचे दर दुप्पट झालेले पाहायला मिळत आहेत. आवक कमी होऊन येत्या काळात भाज्यांचे दर वाढीवच राहणार असल्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.
घाऊकमध्ये बहुतांश भाज्या सरासरी ३०-४० रुपये आणि ४०-५० रुपये प्रतिकिलो झाल्या आहेत. यात भेंडी ३५-४० रुपये, फ्लावर १२-१८ रुपये, कोबी १२-१८ रुपये, ढोबळी मिरची ३०-४० रुपये, तोंडली २६-३० रुपये, वांगी २०-३० रुपये, पडवळ ३०-४० रुपये, टोमॅटो १४-१८ रुपये, सुरण ३०-३५ रुपये प्रतिकिलो असे दर झाले आहेत. दुधी भोपळा १४-३० रुपये, चवळी शेंग २०-३० रुपये, गवार ३०-५० रुपये किलो झाली आहे. हिरवी मिरचीही ३०-५० रुपये किलो आहे.
पावसामुळे कोथिंबिरीचे उत्पादन घटले आणि मुंबईत कोथिंबिरीची आवक ५० टक्क्यांवर आली. परिणामी वीस रुपयांना मिळणारी कोथिंबीर ४० ते १०० रुपये जुडी या दराने मिळत आहे. दररोज बाजारात १०० गाड्या कोथिंबीर बाजारात येत असते, मात्र सध्या कोथिंबिरीच्या ५० गाड्याच येत आहेत. आवक कमी आणि मागणी मोठी असल्याने कोथिंबिरीचे दर पन्नास टक्क्यांनी वाढले आहेत.