सुवर्णा दिवेकर
नवी मुंबई: नारळी पौर्णिमेचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून मुंबईसह किनारपट्टीवरील कोळीवाड्यांमध्ये उत्साहाला उधाण आले आहे.
कोळीवाड्यांची सजावट, पारंपरिक वेशभूषा आणि समुद्रकिनाऱ्यावर रंगणारे विविध कार्यक्रम यामुळे परिसराला सणाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यंदाच्या उत्सवाचे विशेष आकर्षण ठरत आहे ते म्हणजे नव्या पिढीचा आणि सोशल मीडियाचा वाढता सहभाग.
इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब यांसारख्या सोशल मीडिया व्यासपीठांवर नारळी पौर्णिमेच्या पारंपरिक सोहळ्याचे छायाचित्रण आणि व्हिडिओ करण्यासाठी तरुणाई समुद्रकिनारी मोठ्या संख्येने दाखल होत आहे.
कोळी समाजाची पारंपरिक संस्कृती, वेशभूषा, नृत्य, सजवलेल्या होड्या आणि समुद्रपूजेचे क्षण कॅमेऱ्यात टिपून ते सोशल मीडियावर प्रसारित केले जात आहेत.
त्यामुळे स्थानिक उत्सवाची ओळख आता कोळीवाड्यांच्या सीमा ओलांडून जगभरातील सोशल मीडिया वापरकर्त्यांपर्यंत पोहोचत आहे. विशेष म्हणजे, कोळीवाड्यातील लहान मुला-मुलींचाही या उत्सवात उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळत आहे.
कोळी पारंपरिक बारावारी साडी, सुरका - टोपी अशा वेशभूषेत सजलेली चिमुकली मंडळी समुद्रकिनारी फोटोसेशनमध्ये रमलेली दिसत आहेत. त्यांच्या निरागस हास्याने आणि पारंपरिक पेहरावाने कोळीवाड्याचे वातावरण अधिकच खुलून आले आहे.
पूर्वी एखाद्या गावापुरता किंवा कोळीवाड्यापुरता मर्यादित राहणारा पारंपरिक सण आज सोशल मीडियामुळे मोठ्या व्यासपीठावर पोहोचत आहे. नव्या पिढीने आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करताना आपल्या मुळांशी असलेली नाळ कायम ठेवली आहे, हे नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे.
परंपरा आणि आधुनिकतेचा हा सुंदर संगम नारळी पौर्णिमेच्या उत्सवाला नवी ओळख देत असून, सोशल मीडियामुळे यंदाचा नारळी पौर्णिमेचा जल्लोष अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.