पुढारी ऑनलाईन डेस्क : औरंगजेबाचे समर्थन आम्ही करू शकत नाही. औरंगजेब तुमचा कोण लागतो ? याचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यावे. शिवछत्रपतींचा अपमान करायचा. दुसरीकडे औरंगजेबाचा विषय काढून दंगली घडवून आणायच्या, हेच भाजपचे घाणेरडे राजकारण आहे. नागपूरमध्ये गृहमंत्र्यांचे घर आहे, राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे घर आहे. मग तिथे हिंदू खतरे में कसा काय ? असा खोचक सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला. आज (दि.१८) ते पत्रकारांशी बोलत होते.
ते पुढे म्हणाले की , नागपुरातील हिंसाचार हा पूर्वनियोजित कट असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस सांगत आहेत. मग गृहखाते झोपले होते का ? असा सवाल करून राज्यातील डबल इंजिन सरकार केवळ वाफा सोडत आहे. हिरव्या रंगावर इतका राग असेल. तर तुमच्या झेंड्यावरील हिरवा रंग काढून दाखवा , असे आव्हान त्यांनी भाजपला दिले. केवळ आंदोलन कसले करता, पंतप्रधान मोदींकडे जाऊन कबर काढायला सांगा, असा टोलाही त्यांनी राज्य सरकारला लगावला.
शिवछत्रपतींचा अवमान करणारे प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर अद्याप मोकाट फिरत आहे. त्यांना अटक करता आलेली नाही. औरंगजेब महाराष्ट्र जिंकायला आलेला होता. मात्र एकही कण जिंकू शकला नाही. असंख्य मावळ्यांनी त्याला मूठ माती दिली. अशा औरंगजेबाचे कोणीही शिवप्रेंमी समर्थन करणार नाही. कबर उखडण्यासाठी तुम्ही असमर्थ आहात का ? असा सवालही त्यांनी यावेळी केला.