मुंबई: विहिरी आणि बोअरवेलमधून पाणी काढण्यास शासनाने हरकत घेतल्याने मुंबईतील वॉटर टँकरमालकांनी रविवार मध्यरात्रीपासून संपाचा इशारा दिला होता. त्याला शासनाकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नसल्याने संपावर ठाम राहण्याचा निर्णय टँकरमालकांनी घेतला आहे.
त्यामुळे मध्यरात्रीपासून टँकरमालक पाणी भरण्याचे काम थांबविणार असल्याचे मुंबई वॉटर टँकर असोसिएशनचे प्रवक्ते अंकुर शर्मा यांनी सांगितले. दरम्यान, वॉटर टँकरवर अवलंबून असलेल्या मुंबईकरांची आजपासून पाण्यासाठी दाणादाण उडणार आहे.
केंद्रीय भूजल प्राधिकरणाकडून 'ना हरकत प्रमाणपत्र' घेतले नसल्याने तहसीलदारांनी मुंबईतील पाणी टँकरमालकांना कारवाईची नोटीस बजावली आहे. मात्र, राज्य शासन केवळ टँकरमालकांवर कारवाई करत असल्याने हा अन्याय असल्याचे मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने म्हणणे आहे.
यातून मार्ग निघावा म्हणून शासनासोबत बैठका घेतल्या आहेत. मात्र रविवार संध्याकाळपर्यंत त्यावर कोणतेच उत्तर मिळाले नसल्याने अखेर मध्यरात्रीपासून टँकरमालक पाणी भरण्याचे काम थांबविणार आहेत.
मुंबईत अनेक सोसायटी आणि टॉवर हे खासगी टँकरवर अवलंबून आहेत. साफसफाईसाठी आणि शौचालय वापरासाठी मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने १८ हजार वॉटर टँकर पुरवते. दररोज ३५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. बांधकाम आणि साफसफाईचे शासकीय कार्यालयेसुद्धा टँकरने पाणी घेतात. संप झाल्यास त्याचा मोठा फटका या सर्वांना बसणार आहे.