राजेश सावंत
मुंबई: दररोजचा पाणीपुरवठा व उन्हामुळे होणारे बाष्पीभवन यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव अटू लागले आहेत. 25 दिवसांत 98 हजार 750 दशलक्ष लिटरचा पाणीपुरवठा करण्यात आला असला तरी, तलावांतील पाणीसाठ्यात 1 लाख 45 हजार, 805 दशलक्ष लिटर इतकी घट झाली आहे. यात 20 हजार दशलक्ष लिटरपेक्षा जास्त पाणी ठाणेकरांसह भिवंडीला देण्यात आले आहे, तर 27 ते 28 हजार दशलक्ष लिटरपेक्षा जास्त पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे.
मुंबई शहराला दररोज 3 हजार 950 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो, तर भातसा व अन्य धरणांतून सुमारे 600 ते 700 दशलक्ष लिटरपेक्षा जास्त पाणी ठाणे व भिवंडी शहरासह काही गावांना पुरवले जाते. त्यामुळे गेल्या 25 दिवसांमध्ये 1 लाख 18 हजार दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करण्यात आला. म्हणजेच उर्वरित पाण्याचे बाष्पीभवन झाल्याचे स्पष्ट होते.
20 मार्चला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये 6 लाख 38 हजार 111 दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा होता. 14 एप्रिलला सकाळी सहा वाजता सातही तलावांतील पाणीसाठ्याचा आढावा घेतला असता, 4 लाख 92 हजार 306 दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा होता. म्हणजे गेल्या 25 दिवसांत सातही तलावांतून 1 लाख 45 हजार ,805 दशलक्ष पाण्याची घट झाली. त्यामुळे पाणीसाठा आता 34 टक्क्यांवर आला आहे.
येणाऱ्या काळात तापमानात काही प्रमाणात घट झाल्यास बाष्पीभवनचे प्रमाण कमी होईल, असे पालिकेच्या जल अभियंता विभागातील एका वरिष्ठ अभियंत्याने सांगितले.
पाणीटंचाईचे टेन्शन नाही!
सातही तलावांमध्ये असलेला 34 टक्के पाणीसाठा कोणतीही कपात लागू न करता जुलै महिन्यापर्यंत पुरेल इतका आहे. त्यामुळे मुंबईकरांना सध्या तरी पाणीटंचाईचे टेन्शन नसल्याचे जल अभियंता विभागाकडून सांगण्यात येत आहे. पण पाणीसाठ्याचा दर आठवड्याला आढावा घेऊन, त्या-त्या वेळी कोणता निर्णय घ्यायचा हे ठरवण्यात येईल,असेही पालिकेकडून सांगण्यात आले.
मुंबईला सर्वाधिक पाणीपुरवठा करणाऱ्या राज्य सरकारच्या भातसा तलावातील पाणी साठ्यात मोठी घट झाली आहे. या तलावातील पाणीसाठा 33.20 टक्क्यांवर आला आहे. 25 दिवसांपूर्वी या तलावात 43.89 टक्के इतका पाणीसाठा होता. 25 दिवसांत 76 हजार दशलक्ष लिटरने पाण्यामध्ये घट झाली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या ठाणे जिल्ह्यातील तानसा धरणातील पाणीसाठा 28 टक्के इतका खाली आला आहे. नाशिक जिल्ह्यातील अप्पर वैतरणा तलावातील पाणीसाठाही 34 टक्के इतका आहे.नॅशनल पार्कमधील विहार तलावामध्ये सर्वाधिक 55 टक्के पाणीसाठा असला तरीही तलाव अन्य तलावांच्या तुलनेत लहान असल्यामुळे या तलावातून शहराला जेमतेम 18 दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा होतो.