Mumbai University / मुंबई विद्यापीठ Pudhari News Network
मुंबई

Mumbai University | ६० पैकी ५२ विद्यार्थी अनुत्तीर्ण! मुंबई विद्यापीठाच्या एमएमएस निकालाने नवा वाद

Mumbai University MMS Result Controversy- लेखी परीक्षेत सर्वांना शून्य गुण

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाइन शिक्षण केंद्राच्या (सीडीओई) मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (एमएमएस) अभ्यासक्रमाच्या परीक्षेच्या निकालाने नव्या वादाला तोंड फोडले आहे. या परीक्षेत तब्बल ६० पैकी ५२ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले असून, अनेक विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनात चांगले गुण मिळूनही लेखी परीक्षेत शून्य गुण देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या मूल्यमापन प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. परीक्षा विभागाच्या कार्यक्षमतेबाबत विद्यापीठाकडून सातत्याने दावे केले जात असले, तरी प्रत्यक्षात निकालांमधील त्रुटींमुळे हे दावे वारंवार फोल ठरत असल्याची टीका होत आहे.

विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, वर्षभरात आवश्यक शैक्षणिक साहित्य वेळेवर उपलब्ध झाले नाही. अभ्यासक्रमासाठी केवळ एकच पूर्णवेळ शिक्षक होता, पहिल्या सत्रात अवघ्या आठ तासिका घेण्यात आल्या, तसेच प्रशासनाकडून आवश्यक माहिती वेळेवर दिली जात नसल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली. यासंदर्भात अनेक वेळा ई-मेलद्वारे तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

कुलसाच कुलसचिव प्रसाद करांडे यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांना नववालप्रती तातडीने उपलब्ध करून देण्याची तसेच फेरमूल्यमापन करून सुधारित निकाल जाहीर करण्याची मागणी युवासेनेने केली आहे.

कला शाखेच्या पहिल्या सभातील सुमारे १,६०० विद्यार्थ्यांपैकी १,२०० विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याचा दावा करणारी चित्रफित समाजमाध्यमांवर व्हायरल झाली आहे. काही अभ्यासक्रमांचे निकाल चार महिन्यांपासून प्रलंबित असल्याचाही आरोप विद्यार्थ्यांनी केला. या पार्श्वभूमीवर प्रदीप सावंत यांनी बुधवारी विद्यापीठात ठिय्या आंदोलन केले. सुमारे दोन तासांच्या चर्चेनंतर कुलसचिवांनी आंदोलकांशी संवाद साधला. नियमित आणि दूरस्थ शिक्षणाच्या परीक्षा पद्धतीत मोठी तफावत असल्याचे मान्य करत आवश्यक सुध्धरणा करण्याचे आश्वासन विद्यापीठ प्रशासनाने दिल्याचे सावंत यांनी सांगितले.

विद्यापीठाचे स्पष्टीकरण

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची ही पहिली तुकडी असल्याने विद्यार्थ्यांमध्ये काही प्रमाणात संभ्रम असल्याचे सीडीओईच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. एमएमएसमधील बहुतांश विद्यार्थी 'बिझनेस स्टॅटिस्टिक्स' या तुलनेने कठीण विषयात अनुत्तीर्ण झाले असून, त्या विषयासाठी आयोजित प्रत्यक्ष वर्गांना अनेक विद्यार्थी अनुपस्थित होते, असे त्यांनी सांगितले. एनईपीनुसार प्रत्येक सत्रानंतर स्वतंत्र निकाल जाहीर केला जातो. प्रथम वर्ष पूर्ण करण्यासाठी दोन्ही सत्रांतील एकूण ३२ श्रेयांक आवश्यक असून, उर्वरित श्रेयांक पुढील सत्रात पूर्ण करता येतात. तसेच नव्या अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात काही पाठ्यपुस्तकांच्या छपाईस विलंब झाला असला, तरी ती पुस्तके ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आली होती, असेही प्रशासनाने स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT