मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर अधिसभा निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान पार पडले. ३८ मतदान केंद्रात पदवीधर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सुट्टी नसताना कामकाजाचा दिवस असूनही सरासरी ५५ टक्के मतदान झाले. किरकोळ आक्षेप वगळता निवडणूक सुरळीत पार पडली. २७ सप्टेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
तब्बल दोन ते अडीच वर्ष रखडलेली मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर जात असलेल्या दहा पदवीधर मतदारसंघाचे मतदान अखेर मंगळवारी पार पडले. शासकीय कामकाजाचा दिवस, अधून मधून पडणारा पाऊस, यामुळे मतदानासाठी पदवीधर मतदारांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. विद्यापीठाच्या परिक्षेत्रात असलेल्या ३८ मतदान केंद्रावर जावून सुमारे ७ हजारहून अधिक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
युवासेना आणि अभाविपने सर्व दहा जागांसाठी उमेदवार दिल्याने दोन संघटनांमध्ये अटीतटीची लढत होती. मनसे अपक्ष, छात्रभारती, बहुजन विकास आघाडी यांनी काही गटात उमेदवार रिंगणात होते. याचा फटका कुणाला बसणार याची चर्चा आता रंगत आहे. बहुतांश ठिकाणी युवासेना आणि अभाविप तसेच अपक्षांनी मतदान केंद्रांच्या परिसरात मतदान माहिती कक्ष उभारले होते. या मतदान माहिती कक्षावर मतदार यादीतून पसंतीक्रमानुसार मतदान कसे करायचे ही माहिती मतदारांना देण्यात येत होती. काही केंद्रावर मात्र उमेदवारांचे नातेवाईक तसेच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची गर्दी दिसून आली. मतदान केंद्राबाहेर युवासेना आणि अभाविप या दोन्ही संघटनांचे कार्यकर्ते मतदान अधिक होण्यासाठी केंद्राबाहेर तळ ठोकून होते.
कार्यकर्ते आपल्याच उमेदवाराला मत देण्यासाठी पदवीधरांना आवाहन करत होते. भांडूप येथील एका मतदान केंद्राबाहेर कार्यकर्त्यांसाठी वडापावचेही वाटप करण्यात येत होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. दादर येथील किर्ती महाविद्यालयातील मतदान केंद्रावरही काही अंशी चुरशीने मतदान होत असल्याचे दिसून आले. चर्नीरोड, वांद्रे, सांताक्रुझ, पार्ले, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर या भागातील मतदान केंद्रावरही सकाळी गर्दी दिसून आली.
किर्ती, पोद्दार या महाविद्यालयात दादर आणि माहीम स्थानकांवरून गाड्यांची व्यवस्था केल्याचे दिसून आले. मतदार कामावर पोहचण्याच्या अगोदर मतदानासाठी आणले जात होते. यामुळे काही केंद्रावर मतदानाला संमिश्र प्रतिसाद दिसत होता. मुंबई शहरापेक्षा उपनगर आणि परिक्षेत्रातील इतर भागात मतदानाचे प्रमाण कमी- अधिक होते. त्यामुळे अपेक्षित मतदान होऊ शकले नसल्याची खंतही काही उमेदवारांनी व्यक्त केली.