मुंबई: दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी कायदा-सुव्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष नियोजन केले आहे. शनिवारी शहर आणि उपनगरांत मोठ्या प्रमाणावर गोविंदा पथके व नागरिकांची गर्दी होणार असल्याने गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन आणि अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे.
वांद्र्यात सहा तास निर्बंध
वांद्रे येथील जरीमारी रोडवर दहीहंडी कार्यक्रमासाठी स्टेज उभारण्यात येणार आहे. त्यामुळे सायंकाळी ५ ते रात्री ११पर्यंत वाहतुकीवर निर्बंध राहणार आहेत.
हा आदेश पोलीस उपायुक्त (मुख्यालय व मध्य), वाहतूक डॉ. दीपाली धाटे यांच्या कार्यालयातून जारी करण्यात आला आहे. एस. व्ही. रोडवरून हिल रोडच्या दिशेने जरीमरी रोडमार्गे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. विठ्ठल मंदिर सिग्नलवर यू-टर्न घेऊन एस. व्ही. रोडने उत्तरेकडे, त्यानंतर डॉ. व्ही. आर. रघुनाथ मार्ग, सेंट मार्टिन रोडमार्गे हिल रोडकडे जाता येईल.
गोविंदांच्या सुरक्षेकडेही लक्ष
पावसामुळे रस्ते निसरडे झाल्यास मनोरा उभारताना अधिक काळजी घेणे, मनोऱ्याच्या परिसरात अनावश्यक गर्दी होऊ न देणे आणि वैद्यकीय मदत उपलब्ध ठेवणे महत्त्वाचे आहे.
घाटकोपरमध्ये १६ तासांहून अधिक काळ मार्ग बंद
घाटकोपर पश्चिमेतील टिळकवाडी, साईनाथनगर येथे मोठ्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे अंधेरी-घाटकोपर लिंक रोडवरील श्रेयस जंक्शन ते भीमनगर जंक्शनदरम्यानची दक्षिण वाहिनी सकाळी ७ ते रात्री ११.३० पर्यंत सर्व वाहनांसाठी बंद राहणार आहे. हा आदेश पूर्व उपनगर वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त कार्यालयाने जारी केला आहे.