मुंबई : दहीहंडी उत्सवात थर लावताना पडून किंवा प्रवासात दरवर्षी शेकडो गोविंदा जखमी होत असतात. गोविंदाना तत्काळ उपचार मिळावेत यासाठी मुंबई व ठाण्यात महापालिका प्रशासनाने विशेष कक्ष उभारले असून राखीव खाटांची व्यवस्था केली आहे.
मुंबई महापालिकेने प्रत्येक रुग्णालयात 30 ते 40 राखीव बेड ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर ठाण्यात ठाणे सिव्हील रुग्णालयात जखमी गोविंदांसाठी 20 खाटांचा विशेष कक्ष उभारण्यात आला आहे.
दरवर्षी मुंबई महापालिकेकडून पालिका रूग्णालयात जखमी गोविंदासाठी विशेष व्यवस्था केली जाते. यावषीं 16 उपनगरीय रूग्णालयात 105 खाटांची व्यवस्था असणार आहे. प्रमुख रुग्णालयांमध्ये प्रत्येकी 30 ते 40 खाटांची व्यवस्था करण्यात आली होती. गोविंदावर तात्काळ उपचार करावेत, दिरंगाई करू नये, वरिष्ठ डॉक्टर आणि अपघात विभागामध्येही ऑन ड्युटी निवासी डॉक्टरांना जखमी गोविंदावर तत्काळ उपचार करून संबंधित विभागांना कळविण्यास सांगण्यात या सूचना देण्याचे परिपत्रक काढले आहे.
ठाणे सिव्हिल रुग्णालयात विशेष कक्ष
ठाणे सिव्हील रुग्णालयात जखमी गोविंदांसाठी 20 खाटांचा विशेष कक्ष उभारण्यात आला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली या कक्षात सर्व आवश्यक सुविधा, औषधे आणि प्रशिक्षित वैद्यकीय पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत.
दहीहंडी हा केवळ शक्ती, कौशल्य आणि मैत्रीचा सण नाही, तर काळजी, जिव्हाळा आणि सुरक्षिततेची भावना जपण्याचे प्रतीक आहे. या उत्सवात प्रत्येक गोविंदाची सुरक्षा तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे दहीहंडीचे मनोरा लावताना कोणी गोविंदा जखमी झालाच तर त्याच्यासाठी सिव्हिल रुग्णालय विशेष कक्ष तयार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी सांगितले.
आपत्कालीन परिस्थितीत आम्ही जखमी गोविंदावर उपचार करणार आहोत. राखीव बेड ठेवण्यात आलेले असून ऑनड्युटी निवासी डॉक्टरासह वरिष्ठ डॉक्टरही रुग्णालयात हजर असतील.डॉ. नीलिमा आंद्रडे, संचालिका, पालिका प्रमुख रूग्णालय