मुंबई : परतीच्या पावसाचा भर ओसरल्याने मुंबई शहर आणि उपनगरांमधील तापमानात मोठी वाढ झाली. काल कमाल ३१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज पारा ३३ अंशांवर जाण्याची शक्यता आहे.
कुलाबा आणि सांताक्रूझ वेधशाळेमध्ये रविवारी प्रत्येकी २८ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाचा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात त्यात थेट तीन अंशांनी वाढ झाली. सोमवारी तापमानात आणखी वाढ अपेक्षित आहे. त्यामुळे आज तापमान पस्तिशीच्या घरात पोहोचेल. मंगळवारपासून त्यात थोडी घट होऊ शकते. पारा पस्तिशीच्या घरात पोहोचला तरी प्रत्यक्षात जाणवणारे तापमान त्याहून अधिक असल्याने दुपारच्या वेळी कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे. गेल्या आठवड्यात मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडला. मात्र, गेल्या दोन दिवसांत मुंबईत उघडीप दिसून आली. मात्र, थोड्या विश्रांतीनंतर मंगळवारपासून (१ ऑक्टोबर) मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) फोरकास्टमध्ये तसे सांगण्यात आले आहे.