मुंबई : मुंबई शहरात वाहन चोरीच्या घटना सातत्याने वाढत असून अशातच साकीनाका परिसरातील एका घटनेमुळे पोलिस आणि वाहतूक विभागाच्या कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. घरासमोरून चोरी गेलेली स्कूटर पोलिसांनी टो करून नेल्यानंतर चोरानेच दंड भरून सोडवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित कृष्णा अभिमन्यू सिंह यांनी त्यांची दुचाकी 5 फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे 9.30 वाजता अशोकनगर बस स्टॉपजवळ पार्क केली होती. दुसऱ्या दिवशी 6 फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे 8.30 वाजता बाहेर आल्यावर स्कूटर त्या ठिकाणी दिसली नाही.
आजूबाजूला शोध घेतल्यानंतरही स्कूटरचा काहीच पत्ता लागला नाही. त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी वाकोला पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, यही स्कूटरला सांताक्रूज वाहतूक विभागाने टो करून नेली आहे, याबाबतचा संदेश तक्रारदाराच्या मोबाईलवर प्राप्त झाला होता. ते स्कूटरच्या शोधासाठी जात असतानाच पुन्हा त्यांना वाहनाचा दंड भरून स्कूटर सोडवून नेल्याची संदेश मिळाला.
ज्या स्कूटरच्या चोरीची आधीच नोंद झाली होती, ती स्कूटर एखाद्या अज्ञात व्यक्तीने दंड भरून सहजपणे कशी सोडवून नेली, याबाबत आता प्रश्न उपस्थित होत आहेत. वाहन सोडवताना मालकीची योग्य तपासणी करण्यात आली होती का, याचीही चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी केली जात आहे.
या घटनेमुळे वाहतूक विभागाच्या निष्काळजीपणावर आणि सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. पीडितांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आहे.