मुंबई : लांबणीवर पडलेल्या पावसाने जुलै महिन्यात रेकाॅर्ड ब्रेक हजेरी लावली. १ ते ७ जुलै दरम्यान मुंबईत ३०० मिमीपेक्षा अधिक पाऊस पडला. तो दिल्ली, पुणे व बेंगळुरू या शहरांच्या तुलनेत अधिक होता. यामुळे पाणी साचणे, झाडे उन्मळून पडणे, घरे आणि संरक्षण भित कोसळणे अशा दुर्घटना घडल्याचे स्पष्टीकरण महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी मंगळवारी महानगरपालिका मुख्यालयात पत्रकार परिषद घेत दिले.
मुंबई यावर्षी तुंबणार नाही असा विश्वास महापलिका प्रशासनाने मुंबईकरांना दिला होता. मात्र पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाली. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल. या काळात ८३० झाडे तर १ हजार २३८ इतक्या झाडांच्या फांद्या पडल्या. पण पहिल्याच पावसात मुंबईत इतके पाणी का साचलं? याचे उत्तर मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांनी यावेळी दिले.
त्या म्हणाल्या, नदी / नाले यांची नियमित सफाई केली होत. गाळ काढला होता. मात्र ३०० मिमी पाऊस कमी वेळेत पडला आणि त्याचवेळी समुद्राला साडेचार मीटरची भरती आली. त्यामुळे मुंबईसारख्या तिन्ही बाजूंनी समुद्र असलेल्या आणि 'रिक्लेमेशन' झालेल्या शहरात पाणी साचणे स्वाभाविक आहे. हा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा म्हणून नॅशनल डिझास्टर रिलीफ फंड यातून निधी मिळविण्यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील आहे. त्यासाठी आयआयटी मुंबईच्या मदतीने सविस्तर प्रकल्प तयार करत आहे.
३०० ते ३५० 'फ्लडिंग स्पॉट्स' कमी करण्यासाठी मोठा प्रकल्प हाती घेत आहोत. यात नवीन पंपिंग स्टेशन्स बांधणे, क्षमता वाढवणे, स्वयंचलित पूरप्रतिबंधक दरवाजे लावणे, पर्जन्य जल वाहिनीचे जाळे भक्कम करणे या गोष्टींचा समावेश असल्याचे यावेळेीत्यांनी सांगितले. तसेच नागरिकांनी नदी, नाल्यात घनकचरा, तरंगता कचरा टाकू नये असे आवाहन केले.
धरणात १२% पाणीसाठा वाढला
जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे एकाच दिवसात धरणक्षेत्रात १२ टक्के पाणीसाठा वाढला आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत अजूनही पाणीसाठा कमीच आहे. धरण क्षेत्रात चांगला पाऊस होणे गरजेचे आहे. कारण एक टक्का पाणीसाठा वाढला तरी तो तीन दिवस पुरतो. ३० सप्टेंबरपर्यंत १०० टक्के पाणीसाठा होणे आवश्यक आहे. तसे झाले तर पुढच्या मान्सूनपर्यंतच पाणी पुरेल, अशी चिंता अश्विनी भिडे यांनी व्यक्त केली आहे. तसेच, अलनिनोमुळे पावसाच्या चक्रावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे पुन्हा काही दिवस कोरडे जाण्याची शक्यता आहे, असही त्यांनी सांगितले.