Mumbai Pune Expressway Traffic Updates:
पुणे/रायगड : मुंबई–पुणे एक्स्प्रेस-वेवर मंगळवारी (3 फेब्रुवारी) सायंकाळपासून तब्बल 16 तासांहून अधिक काळ वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबई आणि पुणे दरम्यानचा प्रवास जवळपास ठप्प झाला आहे. खोपोलीजवळील अदोशी बोगद्याजवळ एका रासायनिक टँकरचा अपघात झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी सुमारे 5 वाजता ज्वलनशील वायू वाहून नेणारा टँकर पलटी झाला. त्यानंतर गॅस गळती सुरू झाल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. परिणामी एक्सप्रेसवेवर तब्बल 40 ते 50 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. मुंबई–पुणे एक्सप्रेसवेबरोबरच जुन्या मुंबई–पुणे महामार्गावरही वाहतूक कोंडी झाली आहे.
अपघातग्रस्त टँकर अजूनही हटवता न आल्यामुळे सध्या एकेरी वाहतूक सुरू आहे. रायगड जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, टँकर हटवण्याची प्रक्रिया सुरू असली तरी ती कधी पूर्ण होईल, याबाबत अजून निश्चित माहिती नाही. त्यामुळे आजही (बुधवारी) दोन्ही दिशांना (मुंबई–पुणे आणि पुणे–मुंबई) मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी राहण्याची शक्यता आहे.
टँकर मधून गॅस लिकेज अथवा निकामी करण्यासाठी पोलीस मंगळवारी सायंकाळपासून प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी केमिकल तज्ज्ञांचे पथकही बोलवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना शक्य असल्यास एक्सप्रेसवेवर प्रवास न करण्याचे आवाहन केले आहे. गुगल मॅप्सवरही हा मार्ग पूर्णपणे ब्लॉक झाल्याचे दाखवले जात आहे.
या कोंडीत अनेक गंभीर आजारी रुग्ण, अगदी कर्करोगाचे रुग्णही अडकले आहेत. महामार्गावर पाणी, अन्न आणि शौचालयांची सुविधा नसल्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. साधारण साडेतीन तासांचा प्रवास आता 15 तासांहून अधिक काळ लांबत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. सोशल मीडियावरही संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
एक्सप्रेसवे आणि जुन्या महामार्गावर कोंडी असल्यामुळे अनेक प्रवासी ताम्हिणी घाट मार्गाचा वापर करत आहेत. पोलिसांनी पुढील पर्यायी मार्ग सुचवले आहेत:
मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वाहतूक बदल
1) ताम्हिणी घाट मार्ग (रायगड मार्गे):
पुणे → पिरंगुट → पौड → मुळशी → ताम्हिणी घाट → वरचीवाडी → साजे → नांदगाव → पाली → पेडली → दुर्शेत → उंबरे → मुंबई (दक्षिण मुंबईसाठी उपयुक्त)
२) माळशेज घाट मार्ग (ठाणे मार्गे):
पुणे → चाकण → नारायणगाव → माळशेज घाट → मुरबाड → कल्याण/ठाणे → मुंबई (उपनगरांसाठी उपयुक्त)
3) भीमाशंकर/मंचर मार्ग (उत्तर मुंबई/पालघरसाठी):
पुणे → मंचर → जुन्नर → माळशेज → मुंबई
कृपया लोणावळा-खंडाळा मार्ग पूर्णपणे टाळावा. प्रवासाचा वेळ 3-5 तासांनी वाढू शकतो, त्यामुळे पुरेसे इंधन आणि पाणी सोबत ठेवावे.
मुंबईहून पुण्याकडे जाताना याच मार्गांचा उलट क्रमाने वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र हे सर्व पर्यायी मार्ग सुमारे 50 किलोमीटरने लांब असून प्रवासात काही तासांचा अतिरिक्त वेळ लागू शकतो.
अपघात हा महामार्ग पोलिसांच्या रायगड हद्दीत झाला असून, महामार्ग पोलीस पुणे विभाग यांच्यामार्फत ताम्हिणी घाट आणि माळशेज घाट मार्गे वाहतूक वळवण्यात येत आहे, कृपया वळवलेल्या मार्गाने मुंबईकडे प्रवास करा.महामार्ग पोलीस अधीक्षक, पुणे विभाग
पोलीस आणि प्रशासनाने नागरिकांना पुढील सूचना दिल्या आहेत:
– खंडाळा आणि लोणावळा एक्झिट टाळा, कारण तिथे मोठी वाहतूक कोंडी आहे.
– प्रवास सुरू करण्यापूर्वी पुरेसे इंधन, पाणी आणि खाण्याची व्यवस्था करून घ्या.
– अवजड वाहनांनी जवळच्या सुरक्षित पार्किंग किंवा फूड मॉलमध्ये थांबावे.
– मुंबई–पुणे दरम्यान रेल्वे सेवा हा सध्या सर्वात विश्वासार्ह पर्याय असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
एक्सप्रेसवे कंट्रोल रूम: 9822498224
हायवे पोलीस: 9833498334 / 100