मुंबई: महापौर कार्यालय उडवून देण्याची धमकी महापालिका अतिरिक्त आयुक्तांना ई-मेलद्वारे मिळाल्यानंतर मुंबई महानगरपालिकेमध्ये एकच खळबळ उडाली. महापालिका मुख्यालयासह महापौर दालनाबाहेरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली असून बंदूकधारी सुरक्षारक्षक प्रत्येक प्रवेशद्वारावर बसवण्यात आले आहेत. अशाच धमक्या पुणे आणि नागपूर महापालिका मुख्यालयांना आल्या.
मुंबई महापालिका मुख्यालयाच्या अपुऱ्या सुरक्षा व्यवस्थेबाबत नेहमी चर्चा होते. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर महापालिका मुख्यालयाची सुरक्षा वाढवण्यासंदर्भात बैठकाही झाल्या. परंतु महापालिका मुख्यालयाच्या सुरक्षेत वाढ झालीच नाही. महापालिका सुरक्षा विभागातील एक दोन सुरक्षारक्षक प्रवेशद्वारावर दिसून येतात.
मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी करण्यात येते. यासाठी मेटल डिटेक्टर डोर व बॅगा तपासण्यासाठी मशीन बसवण्यात आले आहेत. मात्र या मशीनही अनेकदा बंद असतात. त्यामुळे आजच्या धमकीच्या ई-मेलने पालिकेची सुरक्षा व्यवस्था खडबडून जागी झाली आहे. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांना सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ई-मेल द्वारे महापालिका मुख्यालय व महापौर दालन व कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी आली.
बांगर यांनी तातडीने ही माहिती पोलिसांसह महापालिका सुरक्षा विभागाला कळवली. त्यामुळे महापालिका मुख्यालयासह सुरक्षा विभागामध्ये एकच खळबळ उडाली. सुरक्षा खात्यातील वरिष्ठ अधिकारी यांनी थेट मुख्यालय गाठले व महापालिकेच्या प्रवेशद्वारावरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली.
बंदूकधारी गार्ड ठेवण्यात आले असून मुख्यालयात प्रवेश करणाऱ्यांची कसून तपासणी करण्यात येत आहे. महापौर दालना बाहेरही सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली असून दालनातील प्रवेशावर निर्बंध आणण्यात आले आहे.
डॉग स्क्वॉडने केली तपासणी
धमकीच्या इशाऱ्यानंतर पोलिसांनी महापालिका मुख्यालयात धाव घेतली. तातडीने महापौर दालन, महापौर कार्यालय व महापालिका मुख्यालयाची डॉग स्क्वॉडद्वारे तपासणी करण्यात आली. यावेळी मुख्यालयात पोलिसांची एक टीम सकाळपासून कार्यरत होती.
धमक्यांना घाबरणार नाही - महापौर
अशा प्रकारच्या कोणत्याही धमक्यांना आपण मुळीच घाबरत नाही. यापूर्वीही बांगलादेशी फेरीवाले आणि अनधिकृत प्रकरणांवर कारवाई करताना काही घटकांनी माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. पण मी अशा दबावासमोर कधीही झुकले नाही आणि यापुढेही झुकणार नाही. मुंबईकरांच्या हितासाठी माझे काम नियमितपणे सुरू राहील, अशी प्रतिक्रिया यावेळी महापौर रितू तावडे यांनी दिली.
मंत्रालयाच्या धर्तीवर सुरक्षा व्यवस्था
देशाच्या आर्थिक राजधानीचा कारभार सांभाळणाऱ्या मुंबई महापालिका मुख्यालयाची सुरक्षा भक्कम असणे आवश्यक आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मंत्रालयाच्या धर्तीवर महापालिका मुख्यालयाच्या सुरक्षेमध्येही वाढ करण्यासाठी लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे सभागृहनेते गणेश खणकर यांनी सांगितले.