मुंबई: मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची कारकीर्द आतापर्यंत वादग्रस्त ठरली आहे. भाजपाचे अनेक ज्येष्ठ नेतेही महापौरांच्या कारकिर्दीवर नाराज आहेत. उपमहापौर यांच्याप्रमाणे महापौरांनाही सव्वा वर्षाचा कालावधी देण्याचाही विचार सुरू आहे. तर दुसरीकडे भाजपा नव्या महापौरांच्या शोधात असल्याचे समजते. त्यामुळे महापौरांची कारकीर्द अल्पमुदतीची ठरू शकते.
मुंबईच्या महापौर रितू तावडे महापौरांच्या गादीवर बसल्यापासून नेहमीच वादग्रस्त ठरल्या आहेत. मग ती लाल दिव्याची गाडी असो अथवा बंगल्याचे करोड रुपये खर्च करून करण्यात आलेले नूतनीकरण, गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया एक्सपर्टच्या मागणीवरून, त्यांना विरोधकांनी चांगलेच टार्गेट केले आहे.
त्यामुळे पक्ष म्हणून भाजपाही अडचणीत सापडत आहे. महापौरांच्या वादग्रस्त कारकिर्दीबद्दल भाजपाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. परंतु त्यांच्याकडून राजीनामा घेऊन दुसऱ्या महापौरांची नियुक्ती केल्यास भाजपाचीच नाचक्की होऊ शकते. त्यामुळे शिवसेनेप्रमाणे सव्वा वर्षानंतर उपमहापौरांसोबत नव्या महापौरांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.
महापौर व उपमहापौर पद अडीच वर्षाचे आहे. परंतु शिवसेनेने उपमहापौर पद सव्वा वर्षाचे ठेवण्याचा पक्षपातळीवर निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाच वर्षांमध्ये शिवसेनेच्या चार नगरसेवकांना उपमहापौर पदी बसता येणार आहे.
याचाच आधार घेत, भाजपाही महापौर रितू तावडे यांना सव्वा वर्षात हटवून त्या ठिकाणी दुसऱ्या महिला नगरसेवकाची नियुक्ती करणार असल्याचे समजते. त्यामुळे रितू तावडे यांना मे २०२७ मध्ये महापौरांची गादी सोडावी लागण्याची शक्यता आहे.
भाजपाचे नगरसेवकही नाराज
महापौरांच्या कार्यपद्धतीवर भाजपाचे नगरसेवकही नाराज असल्याचे समजते. सभागृहामध्ये विरोधी पक्ष विशेषत: शिवसेना ठाकरे गट वरचढ होत असताना दिसून येत आहे. त्यामुळे विरोधकांना रोखण्यासाठी अभ्यासू व सक्षम महापौर असायला हवा असे काही नगरसेवकांचे म्हणणे आहे.
सभागृहात सत्ताधारी म्हणून भाजपाचा वचक निर्माण करण्यासाठी आपल्या वरिष्ठ नगरसेवकांची चर्चा करून, महापालिका सभागृहाचे कामकाज केले पाहिजे, अशी अपेक्षा आहे. परंतु महापौर कोणाला विश्वासात घेत नसल्याचे बोलले जात आहे.