मुंबई : राजेश सावंत
महापौर वैद्यकीय निधीतून कोणाला किती मदत करायची हा सर्वस्वी अधिकार महापौरांचा आहे. निधी वाटपात सचिव विभागाकडून खो घातला जात आहे. निधी वाटपा संदर्भात कोणतीही नियमावली नसताना केवळ येथील इतिवृत्ताचा आधार घेत, मुंबई बाहेरील गोरगरीब रुग्णांना निधी नाकारला जात आहे. महापौरांची इच्छा असतानाही सचिव विभाग हा निधी नाकारत असल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
गोरगरीब जनतेला स्वतःचे वैद्यकीय उपचार करता यावे, यासाठी महापौर निधीतून 5 ते 25 हजार रुपये पर्यंत निधी दिला जातो. हा निधी देण्याचा सर्वस्वी अधिकार महापौरांचा असतो. महापौर वैद्यकीय निधीची समिती असली तरी निधी कोणाला द्यायचा व किती द्यायचा याबाबत कोणतीही नियमावली तयार करण्यात आलेली नाही.
केवळ या समितीच्या इतिवृत्तामध्ये कोणीतरी सदस्यांनी मुंबई बाहेर निधी देऊ नये, अशी मागणी केली याचा आधार घेत थेट मुंबई बाहेरील रुग्णांना निधी नाकारण्यात येत आहे. एका विरारच्या रुग्णांसाठी महापौर रितू तावडे यांनी स्वतःच्या अधिक घरात खाली विशेष बाब म्हणून मंजूर केलेला 50 हजार रुपयांचा निधी देऊ नये, यासाठी सचिव मंजिरी देशपांडे व उपसचिव सुशील महाजन यांनी महापौरांना चुकीचे मार्गदर्शन केले.
इतिवृत्त हाच नियम असल्याचे भासवत, निधी दिल्यास अडचण येऊ शकते. आतापर्यंत महापौरांनी बाहेरील रुग्णांना निधी दिलेला नाही अशी भीती घातल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे महापौरांनी मंजूर केलेला निधीला स्थगिती देण्यात आली. त्यामुळे डायलेसिसवर असलेला हा रुग्ण वैद्यकीय निधीपासून मुकला आहे.
या अगोदर अनेकदा मुंबई बाहेरील रुग्णांना महापौर वैद्यकीय निधीतून मदत करण्यात आली आहे. एवढेच काय तर, महापौरांनी स्वतःच्या अधिक खरा खाली 50 हजार रुपये पर्यंत मदत केली असल्याचे सचिव विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
आम्ही पण एकेकाळचे मुंबईकर
आम्ही पण एकेकाचे मुंबईकर होतो. मुंबईत घर घेणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्यामुळे मुंबई शहरालगतच्या कल्याण डोंबिवली वसई विरार आधी शहरामध्ये कमी किमतीत घरे घेतली. याचा अर्थ आम्ही मुंबईकर नाही, असा होत नाही. कामानिमित्त आम्हाला मुंबईतच यावे लागते. आम्ही जर मुंबईला विसरलो नाही तर तुम्ही आम्हाला मुंबईपासून वेगळे करणारे कोण, असा संतप्त सवाल रुग्णांनी केला आहे.
महापौरांचा निर्णय घेणार
महापौर वैद्यकीय निधी कोणाला द्यायचा व कोणाला द्यायचा नाही याबाबत महापौर रितू तावडे काय निर्णय घेणार तर दुसरीकडे चुकीचे मार्गदर्शन करणाऱ्या सचिव व उपसचिवांवर कोणती कारवाई करणार, याकडे रुग्णांचे लक्ष लागले आहे.
मुंबईबाहेरील दानशूर व्यक्ती चालतो, मग रुग्ण का नाही?
महापौर वैद्यकीय निधीसाठी अनेक दानशूर व्यक्ती आर्थिक मदत करतात. या व्यक्ती मुंबईतीलच असतात असे नाही. अनेक व्यक्ती या मुंबई बाहेर राहतात. पण गरिबांना मदत व्हावी यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. जर महापौर वैद्यकीय निधीसाठी बाहेरील दानशूर व्यक्ती चालत असेल तर एखाद्या मुंबई बाहेरील गोरगरीब रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी महापौर वैद्यकीय निधीतून मदत का नाही, असा सवाल आता रुग्णांनी केला आहे.