मुंबई : मुंबई पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील सुमारे 56 हजार रिक्त पदे टप्प्याटप्प्याने भरण्यात येणार असल्याचे आश्वासन अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी दिले आहे. त्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या कर्मचार्यांवरील अतिरिक्त कामाचा भार कमी होणार आहे, अशी माहिती म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम व उपाध्यक्ष डॉ. संजय कांबळे-बापेरकर यांनी दिली.
पालिकेतील कर्मचार्यांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांच्या दालनात म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या वतीने आयोजित बैठक पार पडली. या बैठकीस प्रशासनाच्यावतीने उपायुक्त किशोर गांधी, किरण दिघावकर, प्रमुख कामगार अधिकारी सुनिल जांगळे, प्रमुख कर्मचारी अधिकारी शारदा गोसावी व प्रमुख लेखापाल तर युनियनच्या वतीने खजिनदार महेंद्र पवार, मंदार गांवकर उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार सफाई खात्यातील कर्मचार्यांप्रमाणेच मलःनिसारण, मुख्य मलःनिसारण, गटारे, स्मशानभूमी आदी घाणीशी संबंधित काम करणार्या कामगारांना लाड-पागे समितीच्या शिफारशींन्वये वारसाहक्क नोकर्या दिल्या जाणार आहेत.
‘त्या’ कर्मचार्यांची तत्काळ बदली एकाच ठिकाणी राहून, कर्मचार्यांची पिळवणूक करणार्या सफाई खात्याच्या पी.टी. केस खात्यातील 3 लिपिक व केईएम रुग्णालयात सुमारे 26 वर्षे काम करणार्या कर्मचार्याची तात्काळ बदली करण्याचे आदेश डॉ. अश्विनी जोशी यांनी यावेळी दिले.