मुंबई : मतदार याद्यांमधील घोळ आणि मतचोरीचा निषेध करण्यासाठी शिवसेना उबाठा, मनसे यांच्यासह महाविकास आघाडीमधील मित्रपक्षांनी आज मुंबईत विराट मोर्चा काढला आहे. सर्व विरोधी पक्षांचे प्रमुख नेते या मोर्चाचे नेतृत्व करत असून राज्यभरातील लाखो नागरिक या मोर्चात सहभागी झाले आहेत.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, आज मोर्चात सहभागी झालेले हे जागृत देशभक्त मतदार आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईनंतर पहिल्यांदाच सर्व पक्षांचे लोक एकत्र आले आहेत. आज फक्त ठिणगी पेटली आहे; हिचा वणवा भडकू शकतो, असा इशारा शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.यांची भूक संपत नाही. पक्ष आणि चिन्ह चोरले, वडील चोरायचा प्रयत्न केला. आता मत चोरत आहेत, असा टोला लगावत मतचोरी प्रश्न महाराष्ट्र एकवटलेल्याचा आनंथ आहे. मतदार यादीत नाव आहे की नाही तपास, असे आवाहनही त्यांनी केले.
दोन भाऊ एकत्र आले म्हणजे आमचे काम झाले, असे नाही.आम्ही एकत्र आलो ते मराठी माणसासाठी आणि हिंदूंसाठी. त्यासाठी तुमची साथ हवी आहे. मराठी माणसाने मूठ आवळली आहे.ती तुमच्या टाळक्यात हानतील, असा टोलहा यावेळी उद्धव ठाकरेंनी लगावला.
आजचा मोर्चा हा मतदार यादीमध्ये असणार्या घोळाबाबतचा राग व्यक्त करण्यासाठी तसेच आपली ताकद दाखविण्यासाठीचा आहे. या प्रश्नी देशातील अनेकांनी भाष्य केले आहे. त्यामुळे तोच विषय नव्याने सांगण्यासारखं काहीच नाही. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक घ्यायची घाई का आहे, असा सवाल करत आधी मतदार याद्या साफ करा, मगच निवडणूक घ्या, असे आवाहन राज ठाकरे यांनी यावेळी मोर्चाला संबोधित करताना केले.
मतदारा यादीतील गोंधळाबाबत सर्वच पक्षाचे लोक बोलत आहेत. सर्व काही लपून चालले आहे, असे सांगत यावेळी राज ठाकरे यांनी भिवंडीमधील मतदाराने मुंबईच्या मलबार हिलच्या मतदार संघात मतदान केल्याचे सांगत मुंबईत लोकसभा मतदार संघातील मतदार यादी १ जुलै २०२५ रोजी बंद का केली, असा सवालही राज ठाकरे यांनी केला. तसेच यावेळी मतदारसंघ निहाय दुबार मतदानांची नोंदच त्यांनी वाचून दाखवले. आम्ही निवडणूक आयोगाला पुरावे दिले तरी हट्ट सुरू आहे. स्थानिक स्वराज संस्था निवडणुका घेण्याची कुणाला घाई झाली आहे. पाच वर्षे निवडणूक घेतली नाही आणखी एक वर्ष निवडणूक लांबणीवर पडल्याने काय फरक पडणार आहे. सत्ताधार्यांना निवडणूक पदरात पाडून घ्यायची आहे, असा आरोपही त्यांनी केला.
सत्तेचा माज बघा, पैठणचा आमदार भाऊ सांगतो 20 हजार मतदार बाहेरून आले, हल्ली काही कळतच नाही. मतदार यादीत मुलीचे वय जास्त तर बपाचे वय कमी आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकार्यांना भेटायला गेलो तेव्ही मी याबाबत बोललो आहे. वोटिंग मशीन मध्ये गडबड आहे मी ओरडून सांगतोय. - निवडणूक आयोगाच्या माध्यमातून सगळं सुरू आहे. मतदार उन्हातान्हात उभा राहतो त्याचा अपमान नाही का ? जेव्हा कधी निवडणूक होतील तेव्हा घराघरात जा. मतदान केंद्रावर बसायचे आणि दुबार मतदार करण्यास कोणी आले की आधी बडवायचे त्यानंतर पोलिसांकडे सोपवायचे, असेही राज ठाकरे यांनी सांगितले.
मुंबईत महाविद्यालयात शिकत असताना संयुक्त मोर्चासाठी लोक आली होती. आजची चळवळही संयुक्त महाराष्ट्र चळवळी सारखीच आहे. मतचोरीचा विषय निवडणूक झाल्यानंतर समोर आला. विशेषतः विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आम्हाला धक्का बसला. आता लोकशाही चा अधिकार जिवंत ठेवण्यासाठी आपण एकत्र आले पाहिजे, असे आवाहन यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी केले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा रीतसर तिकीट काढून लोकल ट्रेन ने प्रवास. मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून राज ठाकरेंच्या प्रवासासाठी आधीच जवळपास 50 तिकीट काढण्यात आली होती. सर्व तिकीट फर्स्ट क्लासची काढण्यात आली होती. महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार संघटनेचे प्रमुख जितू पाटील यांच्यावर रेल्वे तिकिटांची जबाबदारी देण्यात आली होती.
मोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेसचे राज्यातील वरिष्ठ नेते, शेकापचे जयंत पाटील, तसेच डाव्या पक्षांचे नेते आदी या मोर्चात सहभागी होणार आहेत. मुंबईकरांना त्रास होऊ नये यासाठी हा मोर्चा दुपारी ठेवला आहे. आंदोलनाची पुढील दिशा काय असेल याची घोषणा यावेळी होणाऱ्या सभेतच केली जाणार आहे.
महाविकास आघाडीच्या मोर्चाला मोर्चाला अजूनही पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. परवानगी नसली तरी मोर्चा निघणार असल्याचे उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांची म्हटले आहे.