मुंबई : मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घाटकोपर भागातील चिरागनगर परिसरात गौसिया चाळीवर डोंगराचा मोठा कडा बुधवारी पहाटे दोन ते तीन घरांवर कोसळून किमान सहाजणांचा मृत्यू झाला. चौघे जखमी झाले असून, काहीजण ढिगाऱ्याखाली अडकल्याने मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्रभर पावसाचा जोर कायम होता. याच दरम्यान, पहाटे ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास डोंगराचा काही भाग खचला आणि मातीसह मोठमोठे दगड खाली असलेल्या घरांवर कोसळले. सर्वजण गाढ झोपेत असतानाच हा प्रकार घडल्याने नागरिकांना जीव वाचवून बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. या दुर्घटनेतील मृतांची ओळख पटवण्यात येत आहे. काहीजण अद्याप ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती असून, अग्निशमन दल, मुंबई महापालिका आणि इतर यंत्रणा युद्धपातळीवर मदत कार्य करत आहेत.