मुंबईकरांना पाण्याचे 'नो टेन्शन' file photo
मुंबई

Mumbai News | मुंबईकरांना पाण्याचे 'नो टेन्शन'

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात परतीचा पाऊस जोरदार बरसल्यामुळे तलाव तुडुंब भरली आहेत. त्यामुळे सातही तलावांतील पाणीसाठा ९९.४४ टक्क्यांवर पोहोचला आहे. जो मागील दोन वर्षांच्या तुलनेत जास्त आहे. त्यामुळे आता पाणीटंचाईचे संकट किमान वर्षभरासाठी तरी दूर झाले आहे.

मुंबईकरांची तहान नाशिक व ठाणे जिल्ह्यातील तलावांतून भागवली जाते. यात राज्य सरकारच्या भातसा व अप्पर वैतरणा, तर मुंबई महापालिकेच्या तानसा, मोडक सागर, मध्य वैतरणा या तलावांचा समावेश आहे. या तलावांव्यतिरिक्त नॅशनल पार्कमधील तुळशी व विहार तलावांतूनही मुंबईला पाणीपुरवठा केला जातो. यंदा तलावांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडल्यामुळे जुलैमध्ये काही तलाव ओसंडून वाहू लागले. परंतु गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या परतीच्या पावसाने सातही तलाव तुडुंब भरली आहेत. विशेष म्हणजे शहराला सर्वाधिक पाणीपुरवठा करणारा भातसा तलाव भरला असून या तलावातील पाणीसाठा ९९.३८ टक्क्यांवर म्हणजेच ७ लाख १२ हजार दशलक्ष लिटरवर पोहोचला आहे.

भातसा तलावात शहराला सहा महिने पुरेल इतका पाणीसाठा साठवण्याची क्षमता आहे. त्यामुळे हा तलाव तुडुंब भरणे ही मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. नाशिक जिल्ह्यातील अप्पर वैतरणा तलावही भरला असून पालिकेचे तलावही तुडुंब भरले आहेत. त्यामुळे आता पुढील वर्षीच्या पावसाळ्यापर्यंत मुंबईकरांना पाणीटंचाईची चिंता नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT