मुंबई: पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी साचून मच्छरची पैदास वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे आजारही बळावतात. याला रोखण्यासाठी संपूर्ण मुंबई शहरात अळीनाशक फवारणीवर जोर देण्यात आला आहे. महापालिकेच्या प्रत्येक विभाग कार्यालयाच्या हद्दीत ही मोहीम राबवण्यात येत असून यासाठी खासगी कामगारांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.
महापालिकेच्या कीटकनाशक विभागामार्फत प्रत्येक विभाग कार्यालयनिहाय अळीनाशक फवारणीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. मुंबईतील कानाकोपऱ्यात अळीनाशक औषधाची फवारणी व्हावी यासाठी खासगी संस्थांमार्फत कामगारांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.
ही मोहीम पावसाळा संपेपर्यंत सुरूच राहणार असल्याचे महानगरपालिकेच्या कीटकनाशक विभागाकडून सांगण्यात आले. पावसाळ्यात टायरच्या दुकानासह झोपडीच्या छपरावर टाकण्यात येणारे प्लॅस्टिक कार्पेट, पाण्याच्या बाटल्या, पाण्याच्या बाटल्यांची झाकणे व अन्य वस्तूंचा समावेश आहे.
एवढेच नव्हे तर इमारतीच्या सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी निर्माण झालेली डबकी, बांधकाम साहित्यामध्येही मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहते. विशेष म्हणजे इमारतीवर नव्याने टाकण्यात येणाऱ्या स्लॅबवर पाणी साठवून ठेवण्यात येते.
त्यामुळे अशा ठिकाणी मच्छर मोठ्या प्रमाणात वाढतात. अशा भागात कीटकनाशक व धूम्र फवारणीला प्राधान्य देण्यात येत असल्याचे मुंबई महानगरपालिकेच्या कीटकनाशक विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
आठवड्यातून दोन वेळा फवारणी
आठवड्यातून किमान दोन वेळा धूम्र व कीटकनाशक फवारणी झालीच पाहिजे, असे निकष ठरवण्यात आले आहेत. यात इमारतीचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी महापालिकेच्या कीटकनाशक विभागाचे विशेष लक्ष राहणार आहे. इमारतीमध्ये ठेवलेले अडगळीचे सामान हलवण्यासंदर्भातही बांधकाम व्यवसायिकांना सतर्क करण्यात आल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.
सायफीनोथ्रीन सोल्यूशन या औषधाचा वापर
मच्छरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सायफीनोथ्रीन सोल्यूशन या कीटकनाशक औषधाचा वापर करण्यात येत आहे. संपूर्ण मुंबईत याची फवारणी करण्यासाठी त्या त्या विभाग कार्यालयाला सायफीनोथ्रीन सोल्यूशनचा पुरवठा करण्यात आला आहे.