मुंबई : मुंबईत पायाभूत सुविधांच्या उभारणीवर गेल्या तीन वर्षात मुदत ठेवी मोडून खर्च केला गेला. मात्र मुंबईवरचे हे पायाभूत संकट तसूभर कमी झालेले नाही; उलट ते या पावसाळ्यात वाढलेले दिसते. मुंबई महानगर प्रदेशात अवघ्या चार दिवसांच्या मुसळधार पावसात नऊ जणांचा मृत्यू झाला. मुंबईकरांचे जीवनमान खालावणारे हे पायाभूत संकट आहे तरी काय ?
दळणवळणावर ताण: मुंबईत २००० किमीपेक्षा जास्त लांबीचे रस्ते आहेत. मात्र, गेल्या दशकात वाहनांची संख्या दुप्पट झाली. ५० लाखांहून अधिक दुचाकी आणि चारचाकी वाहने मुंबईतल्या अरुंद किंवा फूटपाथ नसलेल्या रस्त्यांवरूनरोज धावत आहेत.
लोकलवरील ताण: मुंबईची जीवनवाहिनी असलेली उपनगरीय रेल्वे दररोज ७५ ते ८० लाख प्रवाशांची वाहतूक करते. गेल्या पाच दशकांत प्रवाशांच्या तुलनेत लोकल फेऱ्यांमध्ये केवळ तीन पट वाढ झाली.
बसची टंचाई : 'बेस्ट' (BEST) सेवा सध्या ४०० मार्गांवरून दररोज २३ लाख प्रवाशांची वाहतूक करते. बेस्टकडे एकूण २,८०० बसेस धावत असल्या तरी स्वतःच्या मालकीच्या फक्त २४९ बसेस आहेत, बाकी सर्व भाडोत्री आहेत. दहा वर्षांपूर्वी बेस्टकडे ४,००० पेक्षा जास्त बसेस होत्या आणि त्या ४८ लाख प्रवाशांची सेवा करायच्या.
शेवटच्या टप्प्यावरील कनेक्टिव्हिटी : मेट्रो ३ सारख्या नवीन मेट्रो मार्गांमुळे प्रवास सोयीचा झाला असला, तरी मेट्रो स्टेशनवरून अंतिम मुक्कामापर्यंत पोहोचण्यासाठी (लास्ट-माइल कनेक्टिव्हिटी) पुरेशी व्यवस्था नसल्याने प्रवासी संख्येवर परिणाम होत आहे.
कमकुवत झालेली झाडे: झाडांच्या मुळांभोवती मोठ्या प्रमाणावर काँक्रिटीकरण केल्यामुळे मुळांपर्यंत पाणी आणि ऑक्सिजन पोहोचत नाही. वारंवार रस्ते खोदल्यामुळे मुळे कमकुवत होतात. यातून मुंबईत अकस्मात झाडे कोसळणे आता सुरू झाले आहे. पाऊस सुरू होण्यापूर्वी अशा कमजोर झाडांचे सर्वेक्षण उद्यान विभागाने करायचे असते ते झालेलेच नाही असे आता स्पष्ट होत आहे.
निकृष्ट देखभाल: उघडी गटारे, खराब झालेले फूटपाथ, कमकुवत झालेली झाडे आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षेसाठी बॅरिकेड्स नाहीत, यामुळे मुंबईकरांचा जीव धोक्यात येत आहे. मुंबईत आता सहज फिरणेही जीवावर उठणारे ठरत आहे.
प्रशासकीय आणि पर्यावरणीय आव्हाने
एक ना धड, भाराभर यंत्रणा: रस्ते, झाडे, गटारे आणि रेल्वे यांचे व्यवस्थापन मुंबईत वेगवेगळ्या यंत्रणांकडे आहे, ज्यांच्यामध्ये आपापसात कुठलाच समन्वय नाही. त्यामुळे बारभाई कारभार सुरू आहे.
हवामान बदल: मुंबईत आता कमी वेळेत जास्त तीव्रतेचा पाऊस पडतो. त्या प्रमाणात ड्रेनेज यंत्रणा, झाडांचे व्यवस्थापन आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणेमध्ये सुधारणा किंवा अपग्रेडेशन मात्र करण्यात आलेले नाही. याचे ज्वलंत उदाहरण द्यायचे तर अंधेरीच्या मिलन सब वे चे देता येईल.