नवी मुंबईः बारावीच्या निकालाचे स्वागत जल्लोषात करताना नवी मुंबईतील फादर ॲग्नेल्सचे विद्यार्थी. pudhari photo
मुंबई

Mumbai HSC result 2026 : मुंबईचा बारावीचा टक्का घसरला

टॉप-थ्रीवरून थेट पाचव्या क्रमांकावर घसरण , रायगडच्या गुणवंत विद्यार्थ्यांची विजयी पताका

पुढारी वृत्तसेवा

मुंबई/ अलिबाग ः गेल्या वर्षी चार वर्षांच्या घसरगुंडीला ब्रेक देत राज्यात टॉप-थ्रीमध्ये पोहोचलेल्या मुंबई विभागाच्या बारावी निकालाला यंदा पुन्हा उतरती कळा लागली. मुंबई विभागाचा निकाल 90.08 टक्के लागला असून, गतवर्षीच्या 92.93 टक्क्यांच्या तुलनेत तब्बल 2.85 टक्क्यांची घसरण झाली आहे. परिणामी राज्यातील नऊ विभागीय मंडळांच्या क्रमवारीत मुंबई विभाग तिसऱ्या स्थानावरून थेट पाचव्या स्थानी घसरला. रायगड जिल्ह्याने मात्र आपली यशाची परंपरा कायम ठेवत मुंबई विभागात आपले अव्वल स्थान कायम राखले.

राज्यातील एकूण निकालाच्या तुलनेत यंदा कोकण विभागाने 94.14 टक्क्यांसह अव्वल स्थान पटकावले असून, पुणे, अमरावती आणि नाशिक या विभागांनी मुंबईला मागे टाकले आहे. गेल्या वर्षी घसरगुंडी थांबवून पुढे आलेल्या मुंबई विभागाला यंदा पुन्हा घसरणीचा सामना करावा लागला आहे. विशेष म्हणजे, यंदाच्या निकालात मुंबई विभागाची टक्केवारी 90 च्या पुढे असली तरी इतर विभागांच्या तुलनेत ती कमी ठरल्याने क्रमवारीत घसरण झाली आहे.

मुंबई विभागातून यंदा 3 लाख 24 हजार 739 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 3 लाख 23 हजार 501 विद्यार्थी परीक्षेला बसले आणि 2 लाख 91 हजार 415 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण उत्तीर्णतेचे प्रमाण 90.08 टक्के इतके नोंदवले गेले. गेल्या वर्षी 2 लाख 91 हजार 955 विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते, तर यंदा ही संख्या किंचित घटून 2 लाख 91 हजार 415 इतकी झाली आहे. म्हणजेच केवळ 540 विद्यार्थ्यांची घट झाली असली, तरी टक्केवारीत 92.93 वरून 90.08 टक्क्यांपर्यंत म्हणजेच 2.85 टक्क्यांची घसरण झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी नसली, तरी टक्केवारीत झालेली घट ही चिंतेची बाब ठरली आहे.

बारावीच्या प्रगतीपथावर यंदाही मुलींचेच विजयी संचलन दिसते. मुलांचे उत्तीर्ण प्रमाण 87.99 टक्के असताना मुलींचे प्रमाण 92.25 टक्के इतके आहे. मुलींची कामगिरी मुलांपेक्षा तब्बल 4.26 टक्क्यांनी अधिक राहिली आहे. गेल्या वर्षी ही तफावत कमी होती, मात्र यंदा ती अधिक वाढल्याने मुलींची सातत्यपूर्ण प्रगती अधोरेखित झाली आहे.

मुंबईचा बारावीचा टक्का घसरला

रायगड जिल्ह्याने आपली यशाची परंपरा कायम ठेवत मुंबई विभागात आपले स्थान अव्वल राखले. रायगडचा विज्ञान शाखेचा निकाल 98.57 टक्के लागला आहे. तर वाणीज्य शाखेचा 91.29 टक्के तर तांत्रिक विज्ञान शाखेचा निकाल 92.40 टक्के लागला आहे.

विज्ञान, कला आणि वाणिज्य या तिन्ही प्रमुख शाखांमध्ये मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा लक्षणीयरीत्या अधिक आहे. तांत्रिक विज्ञान शाखेत परीक्षेला बसलेल्या 10 पैकी 10 मुली उत्तीर्ण झाल्या असून या शाखेचा निकाल 92.40 टक्के लागला आहे. ठाणे, पालघर आणि मुंबईच्या तुलनेत रायगडने विज्ञान शाखेत 98.57 टक्के य़श प्राप्त करुन उत्कृष्ट कामगिरी नोंदवली आहे.

रायगडमध्ये विज्ञान अव्वल

रायगड जिल्ह्यात विज्ञान शाखेने सर्वाधिक यशाची टक्केवारी नोंदवली. विज्ञान शाखेचा जिल्ह्याचा निकाल 98.57 टक्के लागला. यामध्ये 98.90 टक्के मुलींनी तर मुलांनी 98.24 टक्के मुलांनी यश मिळवले आहे. वाणिज्य शाखा शाखेचा एकूण निकाल 91.29 टक्के लागला असून, मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 94.78 टक्के इतकी उच्च आहे. कला शाखेचा जिल्ह्याचा निकाल 86.03 टक्के लागला असून यात 91.50 टक्के मुली तर 80.45 टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. येथेही मुलींनीच बाजी मारली आहे. व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचा निकाल 89.59 टक्के लागला आहे.

भाषावार परीक्षेत मुंबई विभागात इंग्रजी आघाडीवर

यंदाच्या बारावी परिक्षेत भाषांमध्ये इंगजी भाषेचे विद्यार्थी सर्वाधिक होते. इंग्रजी भाषेचे 3 लाख 45 हजार 337 परिक्षार्थी होते त्यापैकी 91.98 टक्के म्हणजे 3 लाख 17 हजार 631 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर हिंदी भाषेचे 1 लाख 15 868 परिक्षार्थी होते त्यापैकी 96.47 टक्के म्हणजे 1 लाख 15 हजार 051 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मराठी भाषा विषय घेणारे 92 हजार 131 परिक्षार्थी होते त्यापैकी 97.44 टक्के म्हणजे 91 हजार 466 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गुजराती भाषेच्या 763 परिक्षार्थीपैकी 98.69 टक्के म्हणजे 753 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उर्दू भाषेचे 7119 परिक्षार्थीपैकी 95.66 टक्के म्हणजे 7031 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. संस्कृत भाषेचे 1074 परिक्षार्थींपैकी 99.81टक्के म्हणजे 1072 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.फ्रेंच भाषेचे 4875 परिक्षार्थींपैकी 99.47 टक्के म्हणजे 4848 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

बारावी निकालात कोकण अव्वल, लातूर अगदी तळाला

कॉपीमुक्त अभियान, 91 टक्के परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीचा ‌‘वॉच‌’, तर उर्वरित 9 टक्के केंद्रांवरील परीक्षांशी संबंधित कर्मचाऱ्यांची अदलाबदली त्याचा थेट परिणाम बारावीच्या निकालावर झाला. गेल्या पाच वर्षांतील सर्वात कमी अर्थात 89.79 टक्के निकाल लागला आहे. तर गेल्यावर्षीच्या तुलनेत 2.09 टक्क्यांनी निकाल घसरला. या घसरणीतही 94.14 टक्के निकालासह कोकण विभागाने अव्वल स्थान कायम राखले, 84.14 टक्क्यांसह लातूर विभाग शेवटच्या स्थानी फेकला गेला. मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 6.35 टक्क्यांनी जास्त आहे. कोकण आणि पुण्यानंतर निकालात मुंबई, अमरावती, नाशिक विभाग आघाडीवर आहेत. तर, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर विभागाची पीछेहाट झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT